पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये साऱ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागून होतं. कारण पश्चिम बंगालची निवडणूक भाजपा आणि तृणमूल काँग्रेसनं प्रतिष्ठेची केली होती. ममता दीदींना पराभूत करण्यासाठी भाजपाने पश्चिम बंगालमध्ये शड्डू ठोकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र ममता दीदी संपूर्ण भाजपाला उरून पुरल्या. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर भाजपानंही पश्चिम बंगालमधील पराभव स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.

‘पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचं अभिनंदन, केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला पुढेही सहकार्य करत राहील. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि करोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी मदत करू’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

‘पश्चिम बंगालमधील जनतेचा मी आभारी आहे. त्यांनी आमच्या पक्षाला आशीर्वाद दिला. भाजपाच्या जागा निश्चित वाढल्या आहेत. भाजपा जनतेची सेवा करत राहील. निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल मी कार्यकत्यांचे आभार मानतो’, असंही त्याने ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

निरोप घेतो आता! बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर ‘या’ व्यक्तीचा राजकारणाला रामराम

आसामामध्ये सत्ता भाजपानं दणदणीत घरवापसी केली आहे. केरळमध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेनं बहुमत दिलं आहे. एलडीएफने ९३ जागांवर आघाडी घेतलेली आहे. सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात तामिळनाडूमध्ये लढत बघायला मिळाली. सुरूवातीला दोन्ही आघाड्यांमध्ये अटीतटीची लढत सुरू झाली. मात्र, नंतर द्रमुकने जोरदार मुसंडी मारली. तामिळनाडूतील जनतेनं द्रमुकच्या पदरात मतं टाकत स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे.