“भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, आपत्ती व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भारत निश्चित विकासाच्या मार्गावर परतेल” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते सीआयआयला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

“करोनामुळे आपला वेग कितीही धीमा झाला असला तरी, भारताने लॉकडाउनला मागे सोडून अनलॉक फेज १ मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा सुरु झाला आहे. आठ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आणखी वाचा- ‘मेड इन इंडिया’ उत्पादन ‘मेड फॉर वर्ल्ड’ पाहिजे, मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

जगात करोना व्हायरस पसरत असताना भारताने योग्य पावले उचलली असे मोदी यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात घेतलेले निर्णय दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असे मोदी म्हणाले. “करोना व्हायरस विरुद्ध लढताना अर्थव्यवस्थेला पुन्हा बळकट करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी सरकारने तात्काळ आवश्यक पावले उचलली. दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असे अनेक निर्णय घेतले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत ५३ हजार कोटींची आर्थिक मदत देण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सुधारणांसंबंधींचे निर्णय असेच घेतलेले नाहीत. एक निश्चित विचार करुन भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेतले आहेत असे मोदी म्हणाले.