थौबल जिल्ह्यातील लिलोंग भागात सशस्त्र लोकांनी गोळ्या झाडून तीन जणांची हत्या केल्यानंतर मणिपूर सरकारने राज्याच्या खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली. “जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यामुळे कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी आणि पुढील खबरदारीचा उपाय म्हणून इम्फाळच्या सर्व भागात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे”, जिल्हा दंडाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे थौबल, इम्फाळ पूर्व, कक्चिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी एका व्हिडिओ निवेदनात दोषींचा शोध घेतला जाईल असे आश्वासन दिले. “आम्ही ही घटना गांभीर्याने घेतली आहे. मी लोकांना, विशेषत: लिलाँगमधील लोकांना आवाहन करतो की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा अवलंब करण्यापासून दूर राहावे. मी तुम्हाला खात्री देतो की आम्ही दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करू. कृपया सरकारला सहकार्य करा”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा >> मणिपूरमध्ये पुन्हा धुमश्चक्री; मध्यरात्री इम्फाळमध्ये गोळीबार, गार्डचा मृत्यू; भावना भडकवणाऱ्या वार्तांकनासाठी स्थानिक वृत्तपत्र संपादक अटकेत!

पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की, काही बंदूकधारी तोंडावर मास्क बांधून लष्करी वेषात आले होते. त्यांनी स्थानिकांना लक्ष्य करून गोळीबार केला. यात पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या बंदूकधाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी काही वाहने पेटवून दिली.

शनिवारीही झाला होता हल्ला

काही दिवसांपूर्वी, शनिवारी रात्री मणिपूर पोलिसांचे तीन कमांडो सीमावर्ती शहरातील मोरेहमधील त्यांच्या एका चौकीवर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) हल्ल्यात जखमी झाले होते. या हल्ल्यामागे संशयित अतिरेकी असल्याचा संशय आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मणिपूरमध्ये ३ मे रोजी मेईतेई आणि कुकी-झोमी समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून १८० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि अनेक शेकडो जखमी झाले आहेत. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के लोकसंख्या मेईतेई आहेत आणि ते बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात. आदिवासी – नागा आणि कुकी ४० टक्क्यांपेक्षा कमी आहेत आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.