हवामान बदलामुळे मागील २० वर्षांत आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भारताला ५.८ लाख कोटी रुपयांचे (७९.५ अब्ज डॉलर) आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आर्थिक नुकसान, गरिबी आणि आपत्ती: १९९८-२०१७’ शीर्षकाखाली हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. हवामान बदलामुळे होणारे महत्वपूर्ण बदल किंवा मौसमी घटनांचे जागतिक अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या प्रभावाचे यात मूल्यांकन करण्यात आले आहे.

अहवालात म्हटले आहे की, १९९८ ते २०१७ दरम्यान हवामान बदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक घटनांमुळे थेट होणाऱ्या नुकसानीत १५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याचदरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेचे २९०८ अब्ज डॉलरचे थेट नुकसान झाले आहे. हा मागील दोन दशकात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत दुप्पट आहे.

बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलांमुळे जोखीम वाढत आहे. एकूण आर्थिक नुकसानीत मोठ्या मौसमी घटनांमुळे होणारी हानी ७७ टक्के आहे. जी २२४५ अब्ज डॉलरच्या जवळ आहे. त्याचप्रमाणे १९७८ ते १९९७ दरम्यान ८९५ अब्ज डॉलरचे थेट आर्थिक नुकसान झाले होते.

यामध्ये अमेरिकेचे ९४४.८ अब्ज डॉलर, चीनचे ४९२.२ अब्ज डॉलर, जपानचे ३७६.३ अब्ज डॉलर, भारताला ७९.५ अब्ज डॉलर आणि प्युर्तो रिकोला ७१.७ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. पूर, वादळ आणि भुकंपामुळे होणारे जादा आर्थिक नुकसानीत तीन यूरोपीय देश आघाडीवर आहेत. यामध्ये फ्रान्सला ४८.३ अब्ज डॉलर, जर्मनीला ५७.९ अब्ज डॉलर आणि इटलीला ५६.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 8 lakh crores of loss in 20 years of natural calamity in india un report
First published on: 11-10-2018 at 14:10 IST