करोनाची दुसरी लाट मंदावली असतानादेखील संक्रमणाचा कहर अजूनही थांबलेला नाही. देशात पुन्हा ५०  हजाराहून अधिक नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ५४ हजार ६९ नविन बाधितांची नोंद झाली आहे. तर १,१३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी देशात ५० हजार ८४८ करोना बाधित आढळले होते. दरम्यान, ६६ हजार ८८५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे त्यामुळे मागील २४ तासात १६ हजार १३७ रुग्णांमध्ये घट झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सलग ४२ व्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. २३ जूनपर्यंत देशभरात ३० कोटी १६ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ६४ लाख ८९ हजार लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर आतापर्यंत ३९ कोटी ७८ लाखाहून अधिक करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी सुमारे १९ लाख करोना नमुना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

देशभरात आतापर्यंत ३ कोटी ८२ हजार ७७८ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ९० लाख ६३ हजार ७४० रुग्णांना करोनावर मात केली आहे. सध्या देशभरात ६ लाख २७ हजार ५७ रुग्ण उपचाराधिन आहेत. देशातील एकूण करोना मृतांची संख्या ही ३ लाख ९१ हजार ९८१ आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९६.६१ टक्के झाला आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट हा ५ टक्क्यांच्या खाली असून सध्यो ३.०४ टक्के आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

पाच राज्यांमध्ये सर्वाधिक करोनाबाधित

नविन बाधितांपैकी ७१ टक्के रुग्ण हे पाच राज्यांमधील आहेत. केरळमध्ये २३.६५ टक्के नवे बाधित आढळून आले आहेत. पाच राज्यांपैकी केरळमध्ये १२,७८७, महाराष्ट्रात १०,०६६, तमिळनाडूमध्ये ६,५९६, आंध्रप्रदेशात ४,६८४ तर कर्नाटकमध्ये ४,४३६ नवे बाधित आढळून आले आहेत. सर्वात जास्त मृतांची संख्या महाराष्ट्रात असून त्यानंतर तमिळनाडूचा क्रमांत लागतो.