नेपाळमध्ये आज  ७.९ रिश्टर स्केलचे तीव्रतेचा भूकंप झाला. यात आतापर्यंत १०० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये काही भारतीय पर्यटकही अडकल्याची माहिती आहे. मात्र, हे सर्व पर्यटक सुखरुप असल्याचे कळते.
महाराष्ट्रातील ५५६ पर्यटक नेपाळला गेले आहेत. यामध्ये नाशिकहून चौधरी यात्रा कंपनीतर्फे गेलेल्या १००, वीणा वर्ल्डमधून गेलेल्या ४०० तर केसरी टूर्सच्या ५६ पर्यटकांचा समावेश आहे. सुदैवाने सर्व पर्यटकांशी संपर्क झालेला असून पर्यटक सुखरुप असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्व पर्यटकांच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळालेला आहे.
एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेले महाराष्ट्रातील गिर्यारोहक सुखरुप
गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेले महाराष्ट्रातील गिर्यारोहक सुखरुप असल्याची माहिती दिली. एव्हरेस्टचा बेसकॅम्प १ आणि २ येथे मदतकार्य पोहचण्यास अडथळे येत असून येथील सद्य परिस्थिती कळलेली नाही.