पीटीआय, नवी दिल्ली : देशाच्या संपर्कक्षेत्रात क्रांतिकारी ठरणाऱ्या ‘५जी’ सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिलीच प्रणाली आहे. विशेष म्हणजे ही ‘५जी’ प्रणाली वापरून पंतप्रधानांनी परदेशात गाडीही चालवली. भारतीय मोबाइल परिषदेच्या (आयएमसी) व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘५जी’ प्रणालीचे उद्घाटन केले. ‘‘या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट झाली आहे,’’ असे प्रतिपादन त्यांनी केले. ‘‘आज १३० कोटी भारतीयांना ५जीच्या रूपात एक सुंदर भेटवस्तू मिळाली आहे. यामुळे अमर्याद संधी उपलब्ध होणार आहेत,’’ असे मोदी म्हणाले. ‘५जी’ प्रणालीचा वापर करून पंतप्रधानांनी युरोपमध्ये गाडी चालवली. गाडी स्वीडनमध्ये होती, तर तिचे नियंत्रण ‘आयएमसी’मधील एरिक्सन कंपनीच्या मंडपात होते. पंतप्रधानांनी तिथे बसून हजारो किलोमीटरवर असलेली गाडी चालवली. यानिमित्ताने ‘५जी’ प्रणालीच्या वेगाची चाचणी घेतली गेली. उद्योगजगताकडून स्वागत ‘५जी’ सेवेच्या रूपाने आपण सर्वसमावेशक डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे, अशी प्रतिक्रिया ‘सीआयआय’चे अध्यक्ष संजीव बजाज यांनी व्यक्त केली. तर अतिवेगवान इंटरनेट शिक्षण, आरोग्य आणि शेतीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी संशोधनासाठी उपयुक्त ठरणारे आहे, असे ‘असोचेम’चे महासचिव दीपक सूद म्हणाले. ‘फिक्की’चे अध्यक्ष संजीव मेहता यांनी, ‘‘आता देशात व्यवसाय करणे आणि जगणे सोपे होणार आहे,’’ अस सांगितले. मोबाइलमध्ये कधी? ‘भारती-एअरटेल’ने मुंबई, दिल्ली, बंगळूरु आणि वाराणसीसह आठ शहरांमध्ये लगेच सेवा सुरू करण्यात आल्याचे जाहीर केले. आघाडीच्या रिलायन्स ‘जिओ’ने चार महानगरांमध्ये याच महिन्यात सेवा सुरू होईल, असे जाहीर केले. ‘व्होडाफोन-आयडिया’ने मात्र अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. ‘जिओ’ने डिसेंबर २०२३ पर्यंत, तर ‘एअरटेल’ने मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देश ‘५जी’च्या जाळय़ात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले. २जी, ३जी आणि ४जी प्रणालींसाठी आपल्याला अन्य देशांवर अवलंबून राहावे लागत होते. संपूर्ण स्वदेशी बनावटीची ५जी प्रणाली विकसित करून भारताने इतिहास घडवला आहे. २जीची नियत आणि ५जीची नियत यांच्यात हाच फरक आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान मोबाइल क्रांती श्रेणी २०१४ २०२२ मोबाइल कारखाने २ २०० मोबाईल वापरकर्ते ६ कोटी ८० कोटी इंटरनेट शुल्क (प्रति जीबी) ३०० १०