Crime News : एखादी महिला लटकलेल्या अवस्थेत आढळली आणि तिच्या शरीरावरील खुणा जर तिची हत्या झाल्याचे दाखवून देत असतील, तरी तिच्या शवोच्छेदन अहवालात मात्र तिने आत्महत्या केल्याची नोंद होते. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व फक्त ५०,००० रुपये देऊन केलं जात होत. इतकी रक्कम दिली की एखादी हत्येचं रुपांतर आत्महत्येत होत असे, छळ झाल्याच्या खुणा पुसल्या जात आणि जखमांबद्दल खोटी माहिती असलेले शवोच्छेदन आणि वैद्यकीय अहवाल तयार केले जात होते.
सध्या पोलिसांकडून या रॅकेटची चौकशी केली जात असून याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे आणि मृ्त्यू प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी ३२ हून अधिक सरकारी डॉक्टरांची चौकशी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा सर्व घोटाळा हा फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय आणि डॉक्टर यांच्या संगनमताने घडतो. यामध्ये पैसे घेऊन महत्त्वाची वैद्याकिय आणि शवोच्छेदनातून समोर आलेली माहिती बदलली असत असा आरोप आहे. एका १९ वर्षीय मंजू नावाच्या पीडितेचा मृत्यू आत्महत्या म्हणून दाखवण्यात आल्याच्या प्रकरणात हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. तिच्या कुटुंबीयांनी तिचा गळा दाबून खून केला आणि पोस्टमार्टम अहवालात फेरफार करण्यासाठी एका फार्मासिस्ट आणि वॉर्ड बॉयला ५०,००० रुपये दिले.
या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बाहजोई सीएचसी येथील फार्मासिस्ट मधुर आर्या आणि वॉर्ड बॉय आणि कंप्युटर ऑपरेटर यश शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासात व्हॉट्सअॅप चॅट आणि आर्या याच्या फोनवर झालेले गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून केलेले पैशांचे व्यवहार आढळून आले आहेत, ज्यामधून अशा प्रकारच्या शेकडो प्रकरणांमध्ये अशाच पद्धतीने हेराफेरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
घोटाळा कसा उघड झाला?
३१ मे रोजी मंजू ही तिच्या हरदासपूर गावातील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या कुटुंबीयांनी पीडितेच्या प्रियकरावर दोष टाकला, पण पोलिस तपासात वेगळंच दिसून आलं. मोबाईल डेटामध्ये दिसून आले की आरोपी हे घटना घडली त्या परिसरात नव्हते पण मंजूचे वडील, भाऊ आणि इतर नातेवाईक होते. पुढील तपासात मंजूच्या मृत्यूच्या काही वेळ आधीच कुटुंबियांनी फोन कॉल केल्याचे समोर आले.
चौकशीदरम्यान, आर्याने कबूल केले की मंजूच्या कुटुंबाने तिची हत्या केली आणि तिने फाशी घेतल्याचा बनाव केला. इतकेच नाही तर तिच्या प्रियकराला फसवण्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या केल्याचे दाखवण्यासाठी आर्याची मदत घेतली. यासाठी ५०,००० रुपये देण्याचे ठरले.
यानंतर मंजूचे वडील चंद्रकेश, तिचा भाऊ धर्मेंद्र आणि नातेवाईक जयप्रकाश आणि प्रवेश यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ज्याने रिपोर्ट डिजीटल पद्धतीने एडिट केली त्या यश शर्मा यालाही अटक करण्यात आली.
रॅकेट कसं चालत असे?
हा सर्व प्रकार अनौपचारिक पद्धतीने चालत आहे. आरोपींचे नातेवाईक आर्या सारख्या मध्यस्थांच्या माध्यमातून संपर्क साधत असत आणि प्रकरणाचे गांभीर्य पाहूण ३० हजार ते १ लाख रुपयांमध्ये सौदा ठरवला जात असे. संगणक ऑपरेटर असल्याने शर्मा याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट सिस्टम वापरता येत होती आणि त्याने त्यामध्ये मागणीनुसार फेरफार केले.
संपर्क साधणे आणि पैशांची देवाणघेवाण ही बऱ्याचदा व्हॉट्सअॅपच, गुगल पे आणि फोन पेच्या माध्यमातून होत असे. पडताळणी टाळून अनेकदा फायली एडिट करून अधिकृत पोर्टलवर अपलोड केल्या जात होत्या. इतकेच नाही तर डॉक्टरांनी अनेक रिपोर्ट्स न तपासताच त्यावर सह्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
आरोपींबद्दल पुरावे सापडले
ज्यामध्ये पेमेंट आणि फेरफार केलेल्या रिपोर्ट्सची मागणी करणाऱ्या शेकडो चॅट्स आर्य याच्या फोनमध्ये आढळून आल्या आहेत, “त्यामध्ये काय लिहायचं आणि काय काढून टाकायचं याबद्दल स्पष्ट सूचना होत्या. काही चॅट्समध्ये जखमांचे फोटो बदलण्याबद्दलही चर्चा झाली,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शर्मा याचा फोन क्लिन करण्यात आला होता, तरीही तीन प्रकरणांमध्ये त्याने फेरफार केल्याचे आढळून आले आहे.
पोलिसांनी आर्या आणि शर्मा यांच्यासह सात जणांना अटक केली आणि ३२ डॉक्टरांवर या प्रकरणात सहभाग असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
संभलचे डीएम राजेंद्र पेन्सिया यांनी स्थानिक डॉक्टरांबरोबर बंद दाराआड बैठक घेतली आणि पुरावे सादर केले. काही डॉक्टरांनी माफी मागितली आणि गैरवर्तन पुन्हा न करण्याचे आश्वासन दिले. आर्या याला निलंबित करण्यात आले आणि शर्मा याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. परंतु बहुतेक डॉक्टरांना तोंडी इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.