लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  आचारसंहितेच्या उल्लंघनाविरोधातील ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅप अत्यंत प्रभावी ठरू लागले असून लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून शुक्रवापर्यंत देशभरातून ७९ हजारहून अधिक तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदवल्या गेल्या आहेत. आचारसंहिता उल्लंघनाच्या बहुसंख्य तक्रारींचे तातडीने निवारणही करण्यात आले आहे.

आयोगाकडे आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींचे निराकरण झाले असून ८९ टक्के तक्रारी १०० मिनिटांत सोडवल्या गेल्या. ५८ हजारहून अधिक तक्रारी (७३ टक्के) बेकायदेशीर होर्डिग्ज आणि बॅनर्सविरोधात नोंदवल्या गेल्या आहेत. पैसे,  भेटवस्तू आणि दारू वाटपाच्या १४०० हून अधिक तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत. २ हजार ४५४ म्हणजे सुमारे ३ टक्के तक्रारी मालमत्तेच्या विद्रूपीकरणाशी निगडित आहेत. बंदुकांचे प्रदर्शन आणि धमकावण्यांसंदर्भातही तक्रारी आयोगाकडे नोंदवण्यात आल्या असून ५३५ तक्रारींपैकी ५२९ सोडवल्या गेल्या आहेत. १ हजार तक्रारी निषिद्ध वेळेनंतर स्पीकरचा वापर करून प्रचार केल्याविरोधात होत्या, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी स्पष्ट केले. 

हेही वाचा >>>पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

आहे तिथून तक्रार नोंदवा!

सी-व्हिजिल अ‍ॅपवर लोकांना निवडणूकविषयक तक्रारी नोंदवता येतील, या अ‍ॅपचा मतदारांनी उपयोग करण्याचे आवाहन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले होते. या अ‍ॅपद्वारे लोकांना जिल्हा नियंत्रण कक्ष, त्यांच्या भागातील निवडणूक अधिकारी, दक्षता अधिकारी व दक्षता पथकाशी संपर्क साधता येतो.

या अ‍ॅपचा वापर करून नागरिकांना काही मिनिटांत राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची त्वरित तक्रार करता येऊ शकते. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात धाव घेण्याची गरज नाही. सी-व्हिजिल अ‍ॅपवर तक्रार पाठवताच तक्रारदाराला युनिक आयडी मिळेल, त्याद्वारे मोबाइलवर तक्रारीचे निवारण झाले की नाही याची शहानिशा तक्रारदाराला करता येईल.