Ahmedabad Air India Plane Crash: एअर इंडियाचे अहमदाबादहून लंडनला जाणारे विमाना टेक ऑफ केल्याच्या काही मिनिटांमध्येच जमिनीवर कोसळलं. या बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान फ्लाइट एआय-१७१ मध्ये २४२ लोक प्रवास करत होते. ज्यामध्ये २३० प्रवासी आणि १२ केबिन क्रू मेंबर होते. या अपघातात अवघा एक प्रवासी जिवंत राहिला आहे. ज्यानंतर देशभरातून या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. यादरम्यान एअर इंडियाचे विमान कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाच्या प्रमुखांनी हा ‘टाटा समूहाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस’ असल्याचे म्हटले आहे.
चंद्रशेखरन काय म्हणालेत?
टाटा समूहाचे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना उद्देशून एक भावनिक संदेश लिहीला आहे. “काल जे झाले ते अकलनाच्या पलीकडचे आहे आणि आम्ही धक्क्याखाली आणि दुखःत आहोत. एकही व्यक्ती गमावणे आमच्यासाठी दुखःद आहे, मात्र एकाच वेळी इतक्या लोकांचा मृत्यू होणे हे समजण्याच्या पलीकडचे आहे. हा टाटा समूहाच्या सर्वात काळ्या दिवसांपैकी एक आहे. आता शब्दांमधून सांत्वना मिळू शकत नाही, मात्र माझ्या संवेदना दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या लोकांचे कुटुंबिय आणि प्रियजनांच्या बरोबर आहेत. आम्ही त्यांच्यासाठी इथे आहोत… तुम्हाला माहिती आहे की मागील २४ तासात भारत, युके आणि युएसमधून तपास पथकं दुर्घटनेचा तपास करण्यासाठी अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू आणि येणाऱ्या निष्कर्षांबद्दल पूर्णपणे पारदर्शक राहू. आम्ही कुटुंबिय आणि त्यांचे प्रियजन, आमचे वैमानिक आणि चालक दल आणि तुमच्या प्रति ऋणी आहोत… जेव्हा सत्यतेची पुष्टी करण्यात आल्यानंतर आम्ही या दुर्घटनेबद्दल माहिती देण्याबाबत पारदर्शक राहू. इतक्या सर्व लोकांकडून एक विश्वसनिय समूह म्हणून जेव्हा आम्ही एअर इंडियाचा ताबा घेतला, तेव्हा याद्वारे प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमची पहिली आणि सर्वात मोठी प्राथमिकता होती. याबद्दल कोणतेही तडजोड केली गेली नाही.”
अहमदाबाद विमान अपघात
गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत तब्बल २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचं हे अपघातग्रस्त विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. पण विमानाने अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली. या दुर्घेटनेत विमानातील सर्व क्रू मेंबर्ससह २६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३०-४० सेकंदांमध्ये हे विमान जवळच असलेल्या बी. जे. वैद्याकीय महाविद्यालयाच्या परिसरात कोसळले. यात विमानातील २४२ पैकी २४१ प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून महाविद्यालयाच्या ज्या इमारतीवर हे विमान कोसळले, तेथील काही विद्यार्थी देखील दगावले आहेत.
एआय १७१ उड्डाण क्रमांकाचे हे विमान बोइंग – ७८७ ड्रीमलायनर प्रकारातील होते. या कंपनीच्या बोइंग – ७३७ प्रकारातील विमानांच्या अलीकडच्या काळातील तीन अपघातांची चर्चा आणि चौकशी सुरू असली, तरी ड्रीमलायनर या प्रतिष्ठित विमानाला झालेला हा पहिलाच भीषण अपघात ठरला.