Air India Crash : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पण या दुर्घटनेचा वापर काही जणांकडून सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर एका पीडित व्यक्तीच्या कुटुंबियाने असंवेदनशील वर्तनावर टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा याबद्दल एक मार्मिक अवाहन केले आहे.

विमान दुर्घटनेत कोमी व्यास, त्यांचे पती प्रतिक जोशी आणि त्यांची तीन मुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान कोमी व्यास यांचे भाऊ कुलदीप भट्ट यांनी सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्सवर आणि कंटेन्ट क्रिएटर्सवर फक्त लाईक मिळवण्यासाठी दुर्घटनेचा गैरफायदा घेणे, खोटी माहिती पसरवणे आणि मृत्यू झालेले आणि त्यांच्या कुटुंबियांचे फेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याबद्दल जोरदार टीका केली आहे.

“सर्वात मोठी अडचण ही आहे की आमचे कुटुंब, याबरोबरच इतर २७० कुटुंबे हे मानसिक आघातातून जात आहेत. आणि सोशल मीडिया इनफ्लुएन्सर्स हे त्यांचे व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या प्रयत्नात अपघाताच्या व्हिडीओंचा गैरवापर करत आहेत आणि बनावट व्हिडीओ पोस्ट करत आहेत,” असे भट्ट म्हणाले.

“एखाद्या कुटुंबाचे खाजगी फोटो बनावट पद्धतीने वापरले जाण्याबद्दल बोलताना भट्ट म्हणाले की, “जेव्हा कोमी आणि इतर विमानातून जात होते तेव्हा त्यांनी सेल्फी घेतल्या आणि आमच्या फॅमिली ग्रुपवर पोस्ट केल्या. आता ते फोटो व्हायरल झाले आहेत. लोक ते फोटो वापरून व्हिडीओ तयार करत आहेत. असाच एक व्हिडीओ भारतात व्हायरल होत आहे. तो एआय वापरून तयार केलेला आहे. एका फोटोपासून फेक व्हिडीओ तयार केला गेला.”

भट्ट यांनी आणखी एका जोडप्याची मुलगी मिराया हिच्या फोटो संबंधित असाच एक घटनेचा उल्लेख देखील केला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “कालपासून एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे ज्यामुळे आम्हाला खूप वेदना होत आहेत. ती मुलगी मिराया आहे, एकदम सुंदर मुलगी. आता आपल्याला डीएनए नमुन्यांबद्दल काहीच माहिती नाही. तो जुळला नाही. सोशल मीडियावर लोक तिचा मृतदेह जळण्यात आल्याचा दावा करत आहेत. तिचे अंत्यसंस्कार होत असल्याचे व्हिडीओ देखील आहेत.

कोमी यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट्स तयार करून तिच्या फोटोंचा गैरवापर केल्याचेही भट्ट यांनी नमूद केले. असे अकाउंट्स तयार केल्याने कुटुंबाचे दुःख आणखी वाढल्याचेही ते म्हणाले. यावेळी भट्ट यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना हे थांबवण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की “कोमीच्या फोटोंचा गैरवापर केला जात आहे. बनावट अकाउंट्स बनवण्यात आली आहेत. मी सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना कृपया हे थांबवण्याची विनंती करतो.”

“जर तुम्हाला माहिती हवी असेल तर अधिकृत अपडेट्ससाठी तुम्ही प्रशासनाकडे जा. आम्ही देखील गरज पडली तर फोटो किंवा व्हिडीओ देऊ. पण कृपया मनोरंजन किंवा प्रसिद्धीसाठी या दुर्घटनेचा गैरफायदा घेऊ नका,” अशी विनंती देखील भट्ट यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना केली आहे.

दुसऱ्या एका खोट्या दाव्याचा उल्लेख करत भट्ट म्हणाले की, “लहान मुलांचे मृतदेह असल्याचे सांगत एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. पण व्हिडिओमध्ये दिसणारी चिन्हे चित्रा अक्षरमध्ये लिहिलेल्या हडप आणि मोहन चौधरी यांच्या शवपेट्या आहेत. हे दुसऱ्याच कुठल्यातरी घटनेतील आहे. अशा गोष्टींचा आम्हावा सामना करावा लागत आहे, हा जास्तीचा मानसिक आघात आहे.”

भट्ट यांनी असंवेदनशील कंटेन्टचा निषेध केला आहे, तसेच त्यांनी लोक नेमकं करत काय आहेत? उद्विग्न सवाल देखील उपस्थित केला. तसेच त्यांनी राष्ट्रीय आपत्तीच्या काळात कंटेन्ट क्रिएटर्सच्या नैतिक जबाबदारीचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. त्यांनी या घटनेचा गैरफायदा घेणे थांबवून पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मान आणि आदर देण्याचे आवाहन केले आहे. “ही माझी तुम्हाला विनंती आहे. कृपया या सर्व गोष्टी थांबवा,” असे ते म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्यात गुरूवारी एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर काही वेळातच अहमदनगरच्या मेघानीनगर परिसरातील एका वैद्यकीय वसतिगृह आणि कॅन्टीन कॉम्प्लेक्सवर कोसळले होते. यामध्ये विमानात प्रवास करणाऱ्या २४१ जणांचा मृत्यू झाला होता तर जमिनीवरही अनेक जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये कोमी व्यास, त्यांचे पती प्रतीक जोशी आणि त्यांची तीन मुले प्रद्युत आणि नकुल आणि मुलगी मिराया यांचा समावेश आहे.