आजपासून एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक विशेष उद्घोषणा ऐकायला मिळणार आहे. ६९ वर्षांनंतर, एअर इंडिया ही कंपनी गुरुवारी त्याच्या संस्थापक पित्याकडे, टाटा समूहाकडे परत आल्यानंतर या संदर्भातील घोषणा इन फ्लाइट अनाऊन्सेमंटमध्ये केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विमानामध्ये बसल्यानंतर होणाऱ्या उद्घोषणेमध्ये कंपनीची मालकी टाटा समूहाकडे आल्याचा उल्लेख करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे. कंपनीकडून दैनंदिन कारभार पाहणाऱ्या विभागाला म्हणजेच ऑप्रेशन्स विभागाला डोअर क्लोझरनंतर म्हणजेच विमानाचे दरवाजे बंद झाल्यानंतर करण्यात येणारी उद्घोषणा बदलण्यास सांगितली आहे.

नवीन आदेशानुसार, “प्रिय प्रवाशांनो, मी तुमचा वैमानिक कॅप्टन (नाव) बोलत आहे. या विशेष उड्डाणामध्ये तुमचं स्वागत आहे जे एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार ठरत आहे. आजपासून एअर इंडिया सात दशकांनंतर पुन्हा एकदा अधिकृतरित्या टाटा समूहाचा भाग झाली आहे. आम्ही तुम्हाला या उड्डाणादरम्यान तसेच एअर इंडियाच्या प्रत्येक उड्डाणादरम्यान सर्वोत्तम सेवा देऊ इच्छितो,” अशी घोषणा आज विमानांमध्ये करण्यात येत आहे.

“एअर इंडियाच्या भविष्यामध्ये तुम्हा सर्वांचा स्वगत आहे. तुमचा प्रवास आनंददायी आणि सुखकर होईल अशी इच्छा व्यक्त करतो, धन्यवाद,” असा या इन फ्लाइट अनाऊन्समेंटचा शेवट असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा समूह आणि सरकारदरम्यान पूर्ण झालेल्या या व्यवहाराबरोबरच मिठापासून सॉफ्टवेअपर्यंतच्या व्यवसायात असलेल्या या समूहाने या विमान कंपनीचा ताबा घेतल्यामुळे, करदात्यांच्या पैशांवर इतकी वर्षे तरंगत ठेवण्यात आलेली ही तोटय़ातील कंपनी विकण्याची अनेक वर्षे सुरू असलेले व अपयशी ठरलेले प्रयत्न संपुष्टात आले आहेत.