श्रीनगर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या नोंदणीत १० टक्क्यांहून अधिक घट झाली असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुरुवारी दिली.

राजभवनात पत्रकारांशी बोलताना सिन्हा म्हणाले, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेपूर्वी भाविकांची नोंदणी चांगल्या गतीने सुरू होती. सुमारे २.३६ लाख भाविकांनी यात्रेसाठी नोंदणी केली होती, परंतु त्यानंतर नोंदणी कमी झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत नोंदणीमध्ये १०.१९ टक्के घट झाली आहे. ते पुढे म्हणाले, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि सुरक्षा दलांच्या सुरक्षात्मक उपाययोजनांमुळे भाविकांमध्ये आत्मविश्वास परत येत आहे, ज्यामुळे नोंदणी पुन्हा वाढू लागली आहे.

दहशतवादी हल्ल्याचा यावर्षीच्या अमरनाथ यात्रेवर परिणाम झाला का, असे विचारले असता, सिन्हा म्हणाले की, त्याचा संपूर्ण जम्मू-काश्मीरवर, विशेषत: खोऱ्यावर परिणाम झाला आहे. ‘बेस कॅम्प’मध्ये त्रिस्तरीय सुरक्षा आहे, तर सुरक्षा दल कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी क्षेत्र वर्चस्व आणि सुरक्षेसंबंधी प्रात्यक्षिके करत आहेत. अधिक पोलीस अधिकारी आणि ‘सीएपीएफ’ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तर सर्व सेवा प्रदात्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे, असे नायब राज्यपाल म्हणाले.

भाविकांकडून नोंदणीची पडताळणी

श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने २२ एप्रिलपूर्वी यात्रेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांकडून पुन्हा पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे. ते म्हणाले, आतापर्यंत ८५,००० भाविकांनी त्यांच्या नोंदणीची पुन्हा खात्री केली आहे. येत्या काही दिवसांत नोंदणी वाढेल अशी आम्हाला आशा आहे, असे नायब राज्यपाल सिन्हा यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षेसाठी ‘सीएपीएफ’च्या १८० तुकड्या

जम्मू : अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी यंदा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) १८० तुकड्या जम्मू विभागात तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. जम्मू येथून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना स्वतंत्र प्रवास करण्याऐवजी अधिकृत ताफ्यात सामील होण्याचे आवाहन जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षक भीम सेन टूटी यांनी यात्रेकरूंना केले आहे.