अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असा आरोप अमित शाह यांच्यावर होतो आहे. अमित शाह यांच्यावर काँग्रेसने अनेक आरोप केले. त्यानंतर अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे आरोप हा सत्याला असत्याचे कपडे घालण्याचा कुत्सित प्रयत्न आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अमित शाह?

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संविधानाचं योगदान, संविधानाचं महत्त्व या विषयाचं आयोजन केलं. ७५ वर्षांची देशाची गौरवयात्रा, विकासयात्रा यांची चर्चा झाली. लोकसभा आणि राज्यसभेत जेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असतात तेव्हा प्रत्येकाचे दृष्टीकोन वेगळे असतात असं अमित शाह म्हणाले.

काँग्रेस पक्षाने वास्तवाची तोडफोड चालवली आहे-अमित शाह

जेव्हा संसदेत चर्चा होते तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची आहेती म्हणजे जे काही मांडलं जाईल त्याला आधार हवा, तथ्य हवं. काँग्रेस पक्षाने सोमवारपासून वास्तवाची तोडफोड केली आहे. ही बाब निषेधार्ह आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. भाजपाच्या वक्त्यांनी संविधानाबाबत, संविधानाच्या मूल्यांवर भाष्य केलं. संविधानाचं कसं संवर्धन केलं ते भाजपाच्या वक्त्यांनी उदाहरणांसह सांगितलं. काँग्रेस पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करणारा पक्ष आहे, संविधान विरोधी पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने वीर सावरकरांचाही अपमान केला. काँग्रेसने आणीबाणी लादून संविधानाची लक्तरं केली. स्त्रियांच्या सन्मानासारखा विषय त्यांनी बाजूला फेकला होता. न्याय व्यवस्थेचा अपमान केला, शहिदांचा अपमान केला. भारताची भूमी तोडण्याचं काम काँग्रेसने केलं. हे सगळं सत्य देशासमोर आलं तेव्हापासून काँग्रेसने पु्न्हा एकदा गोष्टी तोडफोड करुन आणि सत्याला असत्याचे कपडे घालण्याचा एक कुत्सित प्रयत्न केला आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाबासाहेब आंबेडकर विरोधीच आहे काँग्रेस पक्ष-अमित शाह

अमित शाह पुढे म्हणाले, “काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध दर्शवला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतरही काँग्रेसने हेच केलं. १९५१-५२ आणि १९५४ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्याचे प्रयत्न केले. मैत्रीपूर्ण लढतही घेतली गेली नाही. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव कसा होईल तेच पाहिला. भारतरत्न पुरस्काराबाबत बोलायचं झालं तर काँग्रेसच्या नेत्यांनी काही वेळा तर स्वतःच स्वतःला भारतरत्न पुरस्कार दिला आहे. १९५५ मध्ये पंडित नेहरुंनी स्वतःला भारतरत्न पुरस्कार दिला. १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी स्वतःला भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. १९९० मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यावेळचं सरकार हे भाजपाच्या पाठिंब्यावर चालणारं सरकार होतं. १९९० पर्यंत काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळू नये यासाठी प्रयत्न केले. बाबासाहेब आंबेडकर यांची १०० वी जयंतीही साजरी केली नाही. पंडित नेहरुंना बाबासाहेब आंबेडकरांविषयी वाटणारा तिरस्कार जगजाहीर आहे. पंडीत नेहरुंचं पुस्तक सिलेक्टेड वर्ड्स ऑफ जवाहर याच्या दुसऱ्या आवृत्तीततील पृष्ठ क्रमांक ५३२ वर एक उल्लेख आहे. त्यात बाबासाहेब आंबेडकर मंत्रिमंडळातून जाऊ इच्छितात असं पत्र आहे त्यावर पंडीत नेहरु यांनी उत्तर दिलं आहे की आंबेडकर मंत्रिमंडळातून गेल्याने काही फरक पडणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानचं मूल्यांकन नेहरु कसं करत होते हे सांगणारं हे उदाहरण आहे.” असं अमित शाह म्हणाले.