Amit Shah : पहलगामचा हल्ला अत्यंत भयंकर आणि भीषण होता. त्यावर चर्चा होते आहे, ती झालीही पाहिजे. ऑपरेशन सिंदूरच्या आधी मी ऑपरेशन महादेव याची माहिती देतो आहे. सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी सेना, सीआरएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेले. सुलेमान हा लष्कर ए तोयबाचा कमांडर होता. पहलगाम हल्ला आणि गगनीर हल्ल्यात त्याचा सहभाग होता. अफगाण लष्कर ए तोयबाचा अतिरेकी होता. जिब्रानही याच प्रकारतला दहशतवादी होता. मी आज सदनाला हे सांगतो आहे की ज्यांनी बैसरनच्या खोऱ्यात आपल्या नागरिकांवर हल्ला केला त्यात हे तिन्ही दहशतवादी होते. या तिघांचाही खात्मा करण्यात आला अशी माहिती अमित शाह यांनी सभागृहात दिली.

लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांना मी धन्यवाद देतो-अमित शाह

सीआरएफ, लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांना मी लोकसभेतल्या सगळ्या सदस्यांतर्फे धन्यवाद देतो. ऑपरेशन महादेवची सुरुवात २२ मे २०२५ ला झाली. दुपारी एक वाजता पहलगामचा हल्ला झाला, त्यानंतर त्याच दिवशी म्हणजेच २२ एप्रिलला मी संध्याकाळी साडेपाचला पहलगामला भेट दिली.

ऑपरेशन महादेव कसं राबवलं?

२३ एप्रिलला आम्ही एक बैठक घेतली. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर, सीआरपीएफ यांची ही संयुक्त बैठक होती. त्यात आम्ही पहिला निर्णय केला की देशावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला पाकिस्तानात पळून जाऊ दिलं जाणार नाही आणि आपण कुणालाही पळून जाऊ दिलं नाही त्यांना ठार केलं. २२ मे रोजी IB ला एक महत्त्वाची माहिती मिळाली. एका गावात दहशतवादी उपस्थित असल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर २२ मे ते २२ जुलै या दहशतवाद्यांचे सिग्नल आपण तपासले. २२ जुलैला आपल्याला मोठं यश मिळालं कारण सेन्सॉरच्या माध्यमातून हे दहशतवादीच असल्याचं समजलं. त्यानंतर चार पॅराचे जवान, लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त कारवाई सुरु केली. तीन दहशतवाद्यांचा सोमवारी आपण खात्मा केला. दहशतवाद्यांची रितसर ओळख पटवण्यात आली. कारण एनआयएने या दहशतवाद्यांना जेवण पोहचवणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं होतं. चार जणांनी ओळख पटवली की ज्या तिघांचा खात्मा केला तेच दहशतवादी होते ज्यांनी पहलगाम हल्ला केला असंही अमित शाह म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे अमित शाह म्हणाले, ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवादी पाठवणाऱ्यांच्या आकांचा बदला नरेंद्र मोदींनी घेतला. तर आपल्या सैन्य दलांनी पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांचा खात्मा केला. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दिली.