एक्सप्रेस वृत्त
नवी दिल्ली : भारतात लवकरच असा काळ येईल, की ज्यांना आज इंग्रजी बोलण्याचा अभिमान वाटत आहे, त्यांना त्याची लाज वाटेल, असे भाकित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केले. नवी दिल्ली येथे एका पुस्तक प्रकाशन समारंभात शहा बोलत होते.
‘‘जे भारतीय भाषा बोलत नाहीत, ते पूर्णपणे भारतीय राहू शकत नाहीत. आपला देश विदेशी भाषांमधून समजून घेता येणार नाही. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा काळ येईल, जेव्हा या देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना शरम वाटेल. असा समाज तयार होणे आता दूर नाही. आपल्या देशाच्या भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीचे दागिने आहेत. भारतीय भाषांशिवाय आपण भारतीयच राहत नाही. आपला देश, इतिहास, संस्कृती, आपला धर्म हे सर्व समजून घ्यायचे असल्यास, ते विदेशी भाषेतून समजून घेता येणार नाही,’’ असे शहा म्हणाले.
सनदी अधिकारी अशुतोष अग्निहोत्री यांच्या ‘मैं बूँद स्वयं, खुद सागर हूँ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. आपण पुन्हा एकदा आपल्या देशाचा कारभार आपल्या भाषांमधून चालवू, असे आवाहन शहा यांनी केले. गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकार आणि तमिळनाडूमधील द्रमुक सरकारमध्ये भाषावाद सुरू आहे. तमिळनाडू सरकारने हिंदी लादली जात असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रातही पहिलीपासून हिंदीच्या सक्तीचा वाद प्रकोपाला गेला असताना शहा यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
अर्धवट विदेशी भाषांमधून आपण देश संपूर्णत: समजून घेऊ शकत नाही. ही लढाई कठीण असल्याची मला जाणीव आहे. मात्र भारतीय समाज ही लढाई निश्चितच जिंकेल, याची मला खात्री आहे. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री