पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता एका युवा भाजपा कार्यकर्ता मृत्यू प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची दखल आता देशपातळीवर घेण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मृत भाजपा कार्यकर्त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच त्यांनी या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत केली जावी अशी मागणी केली. अर्जुन चौरसिया असे मृतावस्थेत आढळलेल्या कार्यकर्त्याचे नाव असून त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

हेही वाचा >>> ‘…तर देशातील ९९ टक्के प्रश्न सुटतील’, केरळच्या राज्यपालांनी प्रसार माध्यमांना खडसावलं

“कालच त्यांनी (ममता बॅनर्जी सरकार) सरकारचे एक वर्ष पूर्ण केले आहे. या घटनेच्या आधारे आम्ही थांबणार नसल्याचा संदेश त्यांना द्यायचा असेल. मृत तरुणाच्या कुटुंबियांची मी भेट घेतली. त्यांच्याशी मी संवाद साधला. आपला मुलगा गमावल्यामुळे ते हताश झाले आहेत. आमच्या पक्षाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. तसेच आरोपीसही लवकर अटक करायला हवी. आरोपीस अटक करण्याऐवजी प्रशासनाने तरुणाचा मृतदेह बळाचा वापर करुन ताब्यात घेतला. हे अतिशय दुर्दैवी आहे,” असे शाह माध्यमांना बोलताना म्हणाले.

हेही वाचा >>> “विज्ञान नाही, तर मोदी खोटे बोलतात”; करोना मृतांच्या आकडेवारीवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

नेमकं काय घडलं ?

कोलकाता येथील चितपूरमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. अर्जुन चौरसिया असं मृतावस्थेत आढळलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. कोलकात्यातील कोसीपोर परिसरात ही घटना घढली. ही घटना उघडकीस आल्यानंतर भाजपा आणि टीएमसीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ही राजकीय हत्या असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी मृत तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

हेही वाचा >>> स्वदेशी वस्तूंच्या वापराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जोरदार पुरस्कार, जीतो कनेक्ट आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

ही घटना उघडकीस आल्यानंतर, टीएमसी नेते अतिन घोष हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली होती. मृत अर्जुन चौरसिया यानं नगर पालिकेच्या निवडणुकांत टीएमसीचा प्रचार केला असल्याचा दावा अतिन घोष यांनी यावेळी केला. त्यामुळे मृत कार्यकर्ता नेमका कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होता, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> ‘भावाने मला दोनदा फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला’, पतीच्या हत्येनंतर आंतरधर्मीय विवाह केलेल्या तरुणीचा धक्कादायक खुलासा

दरम्यान, मृत तरुण अर्जुन चौरसिया अंतव्रस्त्रे तयार करणाऱ्या कारखान्यात त्याच्या मोठ्या भावासोबत काम करायचा. त्याची आई लक्ष्मी चौरसीया यांनी अर्जुनची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच माझा मुलगा आनंदी असायचा. तो आत्महत्या करुच शकत नाही. या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.