अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांचे वजन घटले नाही, तर उलट १ किलोनी वाढले, असा दावा दिल्लीतील भाजपाचे विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांनी केला आहे. बुधवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. महत्त्वाचे म्हणजे भाजपा नेत्याच्या दाव्यानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे

‘द इकॉनॉमिक्स टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील भाजपाचे विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांनी केजरीवाल यांचे वाढले असल्याचे म्हटले आहे. तसेच केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाबही सामान्य असल्याचा दावा बिधुरी यांनी केला आहे. ”अटक झाल्यानंतर चार दिवसांत अरविंद केजरीवाल यांचे वजन ४.५ किलोने कमी झाल्याचे आदमी पक्षाने म्हटले आहे. मात्र, अधिकृत माहितीनुसार, त्यांचे वजन कमी झाले नसून उलट १ किलोनी वाढले आहे”, असे ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी आठवड्यातून पाच वेळा त्यांच्या वकीलांना भेटण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, त्यांना न्यायालयाने केवळ दोन वेळाच भेटण्याची परवानगी दिली आहे. सामान्य व्यक्ती असो किंवा व्हीआयपी, नियम सर्वांसाठी सारखे आहे. असेही ते म्हणाले.

हेही वाचा – जिवंत असून लाल बिहारींना करण्यात आलं होतं मृत घोषित, आता नरेंद्र मोदींविरोधात लढणार न…

केजरीवाल यांचे वजन घटल्याचा आपचा दावा

दोन दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांचे वजन ४.५ किलोनी घटल्याचा दावा केला होता. अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाची गंभीर समस्या आहे. पंरतु, त्यांनी कधी त्यांच्या आरोग्याच्या समस्यांना देशसेवेमध्ये अडथळा बनू दिलं नाही. भाजपा सरकारने त्यांना अटक केल्यापासून त्यांची प्रकृती ढासळली आहे. ईडीच्या कोठडीत असल्यापासून आतापर्यंत त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तीन वेळा घसरली आहे. अटकेपासून १२ दिवसांत त्यांचं वजन ४.५ किलोने घटलं आहे. मधुमेहग्रस्त व्यक्तीचं वजन अशा पद्धतीने इतक्या वेगाने घसरणं खूप गंभीर बाब मानली जाते. त्यांच्यासमोर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असे त्या म्हणाल्या होत्या.

तिहार जेलच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या दाव्यानंतर तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांचे वजन कमी झाले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना रोज घरचे जेवण दिले जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

मद्यधोरण घोटाळ्यात केजरीवाल यांना अटक

अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी २१ मार्च रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तसेच दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांची कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर ईडीने केलेली कारवाई ही बेकायदेशीर असून कोठडीतून सुटका करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली. मात्र, ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.