BJP Can’t Defeat Us in This Lifetime Arvind Kejriwal Old Video Viral : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठ्या यशाच्या मार्गावर आहे. भाजपाला दिल्लीत बहुमत मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान या विजयानंतर तब्बल २६ वर्षांनी दिल्लीत भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करणार आहे. ताज्या आकडेवारीनुसार भाजपा दिल्लीतील एकूण ७० जागांपैकी ४८ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही.

आपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत .

एक्झिट पोलमध्ये देखील या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळेल असे सांगण्यात आले होते. तर आपकडून या निवडणुकीत सलग तिसर्‍यांचा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न केले जात होते. दरम्यान सध्या दिल्ली निवडणूक निकाल सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. यादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा जुनम्हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते भारतीय जनता पक्ष आपला या जन्मात कधीही पराभूत करू शकणार नाही असे म्हणताना दिसत आहेत.

केजरीवाल नेमकं काय म्हणाले होते?

२०२३ मध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, “…आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अटक करून पक्षात अस्थिरता निर्माण करून नरेंद्र मोदी यांना दिल्लीत आपले सरकार स्थापन करायचे आहे. त्यांना माहिती आहे की निवडणूकीत ते ‘आप’ला हरवू शकत नाहीत. मला त्यांना सांगायचे आहे की केजरीवालला जेलमध्ये टाकले तरी तुरूंगातून आम आदमी पक्ष निवडणूक जिंकेल. मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की मोदीजी तुम्ही या जन्मात तरी दिल्लीत आम आदमी पक्षाला पराभूत करू शकणार नाहीत. तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल.”

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत भाजपाने आठ जागांवर विजय मिळवला आहे. ज्यामध्ये शालीमार बाग, रजौरी गार्डनर, तरी नगर. राजेंद्र नगर, संगम विहार, ग्रेटर कैलाश, पटपडगंज आणि गांधीनगर या मतदारसंघांचा समावेश होता. तर आपने कोंडली, दिल्ली केंट, सुलतानपूर माजरा, सदर बजार, चांदणी चौक, बल्लीमरान , तिलक नगर, तुघलकाबाद आणि बदरपूर येथे विजय मिळवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीतील ७० मतदारसंघात ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते, ज्यामध्ये ६०.५४ टक्के मतदारांनी मतदान केले होते. दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी देशभरात विजयाचा उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीतील भाजपा कार्यालयात देखील मोठी तयारी करण्यात आली आहे.