भूसुरुंग, रॉकेट लाँचर्स, ग्रेनेड्स आणि स्वयंचलित शस्त्रास्त्रे यांच्या साह्य़ाने दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराच्या सहा डोग्रा रेजिमेंटचे २० जवान गुरुवारी शहीद झाले. मणिपूरमधील चंडेल जिल्ह्य़ात हा हल्ला झाला. गेल्या दोन दशकांत लष्करावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या हल्ल्याच कठोर शब्दांत निर्भर्त्सना केली आहे.
मणिपुरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या कामात लष्कर स्थानिक पोलीस प्रशासनाला मदत करते. या पाश्र्वभूमीवर चंडेल जिल्ह्य़ातील टेंगनौपाल आणि न्यू समतल रस्ता या मार्गावरील गस्तीचे काम लष्कराकडे आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे लष्कराचे जवान चार वाहनांतून या ठिकाणी पोहोचले. मात्र, त्याचवेळी दहशतवाद्यांनी या मार्गावर पेरून ठेवलेल्या भूसुरुंगांचे स्फोट घडवून आणले. त्यानंतर चहूबाजूंनी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यात ग्रेनेड, रॉकेट लाँचर्स, स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा वापर होता. या हल्ल्यात लष्कराचे २० जवान शहीद झाले. तर ११ जवान जखमी झाले. dv23अचानक झालेल्या या हल्ल्यातून सावरत लष्करानेही हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिले. त्यात एक बंडखोर ठार झाला. हा हल्ला नेमका कोणी केला याविषयी अद्याप ठोस माहिती मिळू शकली नसली तरी पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेचा हल्ल्यात हात असावा, असा कयास मणिपूरचे गृहसचिव जे. सुरेश बाबू यांनी व्यक्त केला आहे. या हल्लेखोरांना कांगली यावोल कन्ना लुप (केवायकेएल) या संघटनेचा पाठिंबा असल्याचा दावाही बाबू यांनी केला आहे.

मणिपूरमधील घटना क्लेशदायक आहे. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या त्या २० शहीद जवानांना मी वंदन करतो. देशवासीय शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहेत.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हा अत्यंत भ्याड हल्ला आहे. हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा प्रकारच्या हल्ल्यानंतरही लष्कराचे मनोधैर्य खचणार नाही. मणिपूरमधील लष्कराचे काम यापुढेही सुरूच राहील. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात संपूर्ण लष्कर सहभागी आहे.
– मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्री