एकीकडे शासनव्यवस्थेनं राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं पालन करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना दुसरीकडे बरेलीच्या न्यायालयातील न्यायमूर्तींनी केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. बरेली न्यायालयात २०१० मध्ये घडलेल्या जातीय दंगलींच्या खटल्याची सुनावणी चालू आहे. या सुनावणीदरम्यान धार्मिक व्यवस्थेशी निगडित मौलाना तौकिर रझा खान नामक व्यक्ती या प्रकाराची मास्टरमाईंड असल्याचं नमूद करत न्यायालयानं यासंदर्भात सविस्तर टिप्पणी केली आहे. त्यातच सत्तेत असणाऱ्यांनी धार्मिक असायला हवं, अशी टिप्पणी केली आहे. बरेली न्यायालयातील न्यायमूर्ती रवी कुमार दिवाकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी चालू आहे. वाराणसी न्यायालयात न्यायमूर्ती असताना २०२२ साली न्यायमूर्ती दिवाकर यांनीच ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षणाची परवानगी दिली होती. आता न्यायमूर्ती दिवाकर बरेली न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहात आहेत. काय म्हणाले न्यायमूर्ती रवीकुमार दिवाकर? न्यायमूर्ती दिवाकर यांनी यावेळी सत्तेत असणाऱ्यांनी धार्मिक असण्याची अपेक्षा व्यक्त केली. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं उदाहरण दिलं. "जर धार्मिक व्यक्ती सत्तेच्या केंद्रस्थानी असेल, तर त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात. राजकीय तत्वज्ञ प्लेटोनं त्याच्या 'रिपब्लिक' या पुस्तकात यासंदर्भात नमूद केलं आहे. सध्याच्या काळात न्याय ही संकल्पना कायद्याच्या संदर्भात वापरली जाते. पण प्लेटोच्या काळात न्याय ही संकल्पना धर्माच्या संदर्भात वापरली जात होती", असं न्यायमूर्ती दिवाकर म्हणाले. न्यायमूर्तीनी दिलं योगी आदित्यनाथ यांचं उदाहरण! "त्यामुळेच, सत्तेच्या प्रमुखपदी धार्मिक व्यक्ती असायला हवी. कारण धार्मिक व्यक्तीचं आयुष्य आनंदाचं नसतं, त्यागाचं असतं, बांधीलकीचं असतं. उदाहरणार्थ, सिद्ध पीठ गोरखनाथ मंदिराचे पीठाधीश्वर महंत बाबा योगी आदित्य नाथ सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी या सर्व गोष्टी सत्य असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे", असंही न्यायमूर्ती दिवाकर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांचे मोठे विधान, म्हणाले न्यायालयाच्या कार्यक्रमांत पूजाअर्चाऐवजी… न्यायमूर्तींनी यावेळी मौलाना तौकिर रझा खान यांना भावना भडकवणारी भाषणं केल्याप्रकरणी समन्स बजावले आहेत. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. "आम्ही भीतीच्या छायेखाली", न्यायमूर्तींचा धक्कादायक दावा दरम्यान, न्यायमूर्ती दिवाकर यांनी ज्ञानवापी प्रकरणातील निकालानंतर आपल्याला आक्षेपार्ह उल्लेख असलेलं पत्र आल्याचं सांगितलं. तसेच, या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला, तरी आमचं कुटुंबं भीतीच्या छायेखाली आहे, असं न्यायमूर्ती म्हणाले. "माझ्या कुटुंबात एक प्रकारचं भीतीचं वातावरण आहे. मी ते शब्दांत सांगू शकत नाही. कुटुंबातल्या प्रत्येकाला प्रत्येकाची प्रचंड काळजी वाटते आहे. घराबाहेर पडताना अनेकदा विचार करावा लागत आहे", असं न्यायमूर्ती यावेळी म्हणाले.