Bengaluru Stampede Update : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल जिंकल्यानंतर त्यांच्या विजय उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर बंगळुरूचे पोलीस आयुक्त आणि काही महत्त्वाच्या पोलीस अधिकार्यांना निलंबित केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने मोठी कारवाई केली आहे. कर्नाटक सरकारने राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांचे राजकीय सचिव के. गोविंदराज यांना पदावरून हटवले आहे. इतकेच नाही तर राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुखे हेमंत निंबाळकर यांची बदली करण्यात आली आहे.
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गोविंदराज यांना त्यांची नोकरी गमवावी लागली कारण, चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी होण्याच्या काही तास आधी बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या घरी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी तीन कार्यक्रमांना नकार दिला होता आणि विजयी मिरवणुकीला परवानगी दिली जाऊ शकत नाही असे म्हटले होते. तरही गोविंदराज यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयाच्या उत्सवाला परवानगी देण्याची आग्रही मागणी केली होती.
मात्र गोविंदराज यांनी पोलीस आयुक्तांकडून विधान सौधा आणि चिन्नास्वामी स्टेडियम या दोन ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी होकार मिळवला.
नेमकं काय झालं होतं?
इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची एक झलक पाहण्यासाठी बुधवारी लाखो चाहते गोळा झाले होते. आरसीबीने १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र या चाहत्यांच्या आनंद उत्सवाला गालबोट लागलं आणि भीषण घटना घडली. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर जमलेल्या लाखो चाहत्यांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये एका १४ वर्षीय मुलीचा देखील समावेश होता तर ४७ जण जखमी देखील झाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद, सहाय्यक पोलीस आयुक्त सी बालकृष्ण, पोलिस उपायुक्त (मध्य विभाग) शेखर एच टेक्कान्नावर, अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार विकास आणि Cubbon पार्क पोलीस स्टेशनचे सर्कल पोलिस निरीक्षक एके गिरीश यांना गुरूवारी तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे जाहीर केले.
दरम्यान निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपा आणि जनता दल (सेक्यूलर) यांनी आरोप केला आहे की मुख्यमंत्री हे राज्य सरकारची जबाबदारी झटकण्यासाठई पोलीस अधिकार्यांना बळीचा बकरा बनवत आहेत. सिद्धरामय्या यांनी मात्र आरोप फेटाळून लावले आहेत आणि या मुद्द्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधकांवर केला आहे.
ते राजकारणाच्या हेतूने बोलत आहेत. मला या प्रकरणात राजकारण नको आहे. प्रथमदर्शनी जे जबाबदार आहेत, ज्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही, त्यांना निलंबित करण्यात आले आहे, शुक्रवारी पीटीआयशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले.
त्यानंतर लगेचच सिद्धरामय्या यांचे सचिव के. गोविंदराज आणि राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख हेमंत निंबाळकर यांना निलंबित करण्यात आले.