GST On Water In Hotel: भोपाळच्या ग्राहक न्यायालयाने एका रेस्टॉरंटला पाण्याच्या बाटलीवर चुकीच्या पद्धतीने १ रुपये जीएसटी आकारल्याबद्दल एकूण ८,००० रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले आहे. ऑक्टोबर २०२१ पासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल सुमारे चार वर्षांनी तक्रारदाराच्या बाजूने लागला.
२०२१ मध्ये, तक्रारदार ऐश्वर्य यांनी भोपाळमधील एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवण केले होते. यानंतर बिल मिळाल्यावर त्यांना लक्षात आले की, पाण्याच्या बाटलीवर छापलेली कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) २० रुपये होती, परंतु रेस्टॉरंटने त्यावर २९ रुपये आकारले होते. ज्यामध्ये १ रुपये जीएसटीचा समावेश होता. जेव्हा ऐश्वर्य यांनी हे अतिरिक्त शुल्क आकारण्यास आक्षेप घेतला तेव्हा रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी बिल कायदेशीर असल्याचे सांगितले आणि परतावा देण्यास नकार दिला.
यानंतर ऐश्वर्य यांनी या प्रकरणी ग्राहक न्यायालयासमोर मांडले. सुनावणीदरम्यान, त्यांचे वकील प्रतीक पवार यांनी सांगितले की, त्यांच्या अशिलाकडून पाण्याच्या बाटलीसाठी २९ रुपये आकारण्यात आले होते ज्याची किंमत २० रुपये होती. रेस्टॉरंटच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, बसण्याची व्यवस्था, एअर कंडिशनिंग आणि ऑन-टेबल सेवा यासारख्या अतिरिक्त सेवांमुळे पाण्याच्या बाटलीवर एमआरपीपेक्षा जास्त शुल्क आकारणे योग्य आहे.
पण, ग्राहक न्यायालयाने हा रेस्टॉरंटच्या वकिलांचा हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि असा निर्णय दिला की, बाटलीबंद पाण्याच्या एमआरपीमध्ये जीएसटी आधीच समाविष्ट आहे. म्हणून, जीएसटी म्हणून अतिरिक्त १ रुपये आकारल्याने सेवेत कमतरता निर्माण झाली.
यावेळी ग्राहक न्यायालयाने रेस्टॉरंटला जीएसटी म्हणून आकारलेला १ रुपये ग्राहकाला परत करण्याचे आदेश दिले. तसेच ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासबद्दल आणि सेवेच्या अभावासाठी ५,००० रुपये आणि कायदेशीर खर्चासाठी ३,००० रुपये देण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे एकूण भरपाई ८,००० रुपये झाली.
यापूर्वी प्रसिद्ध ब्रँडला ठोठावला होता एक लाखांचा दंड
यापूर्वी बंगळुरूतील एका प्रसिद्ध ब्रँडला पिशव्यांसाठी ग्राहकाकडून पैसे आकरल्याबद्दल एक लाखाचा दंड देण्याचे आदेश दिले होते. एप्रिलमध्ये बंगळुरूमधील टोनिक ब्रँडला पिशव्यांसाठी पैसे आकारणे चांगलेच महागात पडले होते. विविध प्रकारचे मद्यविक्री करणाऱ्या टोनिकचे देशभरातील अनेक शहरात मोठमोठी दुकाने आहेत.
ग्राहक मंचाने टोनिक स्टोअरला एक लाखांचा दंड ठोठावला होता. तर ज्या ग्राहकाने तक्रार केली, त्याला ५,००० रुपये देण्याचे आदेश दिले होते. ग्राहक मंचाचा हा निर्णय देशभरातील ग्राहकांना दिलासा देणारा आहेच, त्याशिवाय खरेदी करताना सजगता बाळगणे किती गरजेचे आहे, याचाही प्रत्यय यातून येत आहे.