नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करली, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेनंतर बुधवारी भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले.

‘‘लोकसभेचे विरोधी पक्ष झाल्यावर देखील राहुल गांधी बालबुद्धीचेच राहिले असून त्यांच्याकडे हे पद सांभाळण्याची परिपक्वता नाही हेच सिद्ध होते,’’ अशी टीका भाजपचे प्रवक्ता व राज्यसभेचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केली. त्यावर, ‘‘नरेंद्र म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे नरेंद्र नव्हे,’’ असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेरा यांनी दिले.

काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, मंगळवारी भोपाळमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना ‘‘पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकले. ‘नरेंदर सरेंडर’, असा आदेश ट्रम्प यांनी काढला आणि मोदींनी तो मान्य केला,’’ अशी बोचरी टीका केली होती. ‘नरेंदर-सरेंडर’ अशी शाब्दिक कोटी केल्यामुळे भाजपने बुधवारी संतप्त प्रतिक्रिया दिली.

पाकिस्तानी लष्कर, हाफिज सईद आणि अझर मसूद या दहशतवाद्यांना देखील ‘सरेंडर’ म्हणण्याचे धाडस झाले नाही असे त्रिवेदी म्हणाले. भाजपच्या टीकेला उत्तर देताना खेरा यांनी ‘‘मोदी अजून ट्रम्पबद्दल बोललेले नाहीत. चीनचाही उल्लेख करत नाहीत,’’ अशी टीका केली.

भाजप गेल्या ११ वर्षांपासून ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपट बनवत होते. पण जेव्हा चित्रपट तयार झाला तेव्हा तो ‘नरेंद्र का आत्मसमर्पण’ असा झाला. यात भाजप-संघाच्या भ्याडपणाचा इतिहास आहे. अशी व्यक्ती देशाची सूत्रे हाती घेते, तेव्हा देशाचे भविष्य धोक्यात येते, ते आपण सध्या पाहत आहोत.

पवन खेरा, प्रवक्ता, काँग्रेस</strong>

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने सरेंडर केलेले नव्हते उलट, पाकिस्तानविरोधातील कारवाई यशस्वी झाल्याची घोषणा संरक्षण दलांनी केली होती, ती केंद्र सरकारने केली नव्हती. राहुल गांधी यांनी ‘सरेंडर’ केल्याचा आरोप करून भारताच्या संरक्षण दलाचा अपमान केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुधांशू त्रिवेदी, प्रवक्ते, भाजप