शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव व मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्या ‘दिलजमाई’साठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी पुढाकार घेतला आहे. राजनाथसिंह व उद्धव ठाकरे यांच्यात बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांना महायुतीत आणण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी भाजपने दर्शवली. अर्थात यावर उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने अखेरीस, मनसेमुळे महायुतीची मते विभागली जाणार नाही; याची काळजी घ्या, असा सल्ला राजनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांना मध्य प्रदेश वा राजस्थान या भाजपशासीत राज्यांमधून राज्यसभेवर धाडण्याची विनंती उद्धव यांनी भाजपला केली आहे.
    राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाही तेच वाटते, अशी भावना राजनाथसिंह यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केली. अलीकडेच महायुतीत सामील झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजप व शिवसेनेच्या कोटय़ातून प्रत्येकी एक लोकसभेची जागा सोडण्यावरदेखील चर्चा झाली. रामदास आठवले यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठविण्यावर अद्याप कोणताही निर्णय भाजपने घेतलेला नाही.