पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या युवा नेत्याची हत्या झाली आहे. पक्षाचे युवा शाखा नेते मिथुन घोष यांची उत्तर दिनाजपूरच्या इटाहारमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली, अशी माहिती बंगालचे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी दिली. तर, मिथुन घोष यांच्या हत्येमागे तृणमुल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे. मिथून घोष यांची हत्या करणाऱ्यांना त्यांची वेळ आल्यावर योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे.

सोमवारी एका ट्विटमध्ये सुवेंदू अधिकारी म्हणाले, “बीजेवायएम व्हीपी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील मिथुन घोष यांची इटाहार येथे हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. ही हत्या तृणमुल काँग्रेसने घडवून आणली आहे. रक्तरंजित असामाजिक शिकारी कुत्रे ज्यांनी आपल्या मालकाच्या आदेशाचं पालन करत मिथून घोष यांची हत्या केली. त्यांची वेळ आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असा इशारा अधिकारी यांनी मारेकऱ्यांना दिला आहे.

बंगालमध्ये गेल्या काही काळात भाजपा आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत संघर्ष होत आहे. याच संघर्षातून राज्यात काही जणांच्या हत्या देखील झाल्या आहेत.