Boycott Turkey Calls : जम्मू आणि काश्मिरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबध तणावाचे बनले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादात तुर्कियेने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. इतकेच नाही तर भारताबरोबरच्या संघर्षादरम्यान पाकिस्तानला ड्रोन आणि ऑपरेटीव्हज देखील पुरवले आहेत. यानंतर भारतात तुर्कियेच्या कंपन्या तसेच इतर मालावर बहिष्कार टाकला जात आहे. असे असले तरीही तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी आपण पाकिस्तानच्या पाठीशी उभे असल्याचे जाहिर केले आहे.
“भूतकाळात होतो तसेच, आम्ही भविष्यातही चांगल्या आणि वाईट काळात तुमच्या पाठीशी उभे राहू,” असे एर्दोगान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या संदेशाला उत्तर देताना म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये एअर स्ट्रईक करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले होते. यानंतर दोन्ही देशात वाढलेला तणाव १० मे रोजी झालेल्या शस्त्रविरामानंतर निवळला आहे. असे असून देखील तुर्कियेच्या हवाई दलाचे सी-१३० लढाऊ विमान आणि युद्धनौका पाकिस्तानात दाखल झाल्या आहेत.
भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून भारतीय सैन्य दलाच्या तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे वापरून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी पाकिस्तानने तुर्कियेचे ड्रोन वापरले होते. पाकिस्तानने Bayraktar TB2 आणि YIHA ड्रोन्स वापरल्याचे म्हटले जात आहे.
तुर्कियेने पाकिस्तानला फक्त ड्रोनच पुरवले नाहीत तर ऑपरेटिव्ह देखील दिले, यामुळे भारतीय नागरिकांमध्ये तुर्कियेबद्दल संतापाची लाट पाहायला मिळत आहे.इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन तुर्किये लष्कराचे ऑपरेटिव्ह देखील ठार झाले आहेत,
तुर्कियेने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने भारतात BoycottTurkey हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. २०२३ साली तुर्कियेमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपानंतर भारताने ऑपरेशन दोस्त राबवत मदतीसाठी धाव घएतली होती, पण याबदल्यात तुर्कियेकडून भारताचे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला ड्रोन पुरवले जात आहेत. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक तुर्कियेला फिरायला जाण्याच्या नियोजन रद्द करत आहेत तसेच तुर्किये मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली जात आहे. भारतातून बहिष्काराची मागणी केली जात असताना तुर्कियेच्या अध्यक्षांना मात्र त्याची चिंता नाही. त्यांनी शरीफ यांच्या पोस्टला टर्किश भाषेत उत्तर दिले आहे.
“तुर्किये-पाकिस्तान बंधुत्व, जे जगातील खूप मोजक्या देशांना मिळाले आहे, जे जगातील सर्वोत्तम खऱ्या मैत्रीच्या उदाहरणापैकी एक आहे. तुर्किये म्हणून, आम्ही पाकिस्तानची शांतता आणि स्थैर्य याला खूप महत्त्व देतो,” असे एर्दोगान म्हणाले आहेत. तसेच भारत किंवा भारताबरोबर झालेला संघर्ष यांचा उल्लेख न करता त्यांनी पाकिस्तानच्या धोरणाची तसेच तडजोड करण्यावर लक्ष्य दिल्याचे कौतुक केले आहे.
“वाद मिटवण्यासाठी संवाद आणि तडजोड यांना प्राधान्य देणाऱ्या पाकिस्तानने दाखवलेला समजूतदार, संयमी धोरण याचे आम्ही खूप कौतुक करतो,” असे एर्दोगान यांनी म्हटले आहे. तसेच “पाकिस्तान-तुर्किये मैत्री टिकून राहो” असेही एर्दोगान म्हणाले आहेत. शेहबाज शरिफ यांनी एर्दोगान यांना त्यांच्या पाठिंब्यासाठी आभार मानणारे पत्र लिहिले जोते. त्यानंतर एर्दोगान यांनी हा संदेश दिला आहे.