Budget 2019 मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प हा शेतकरी मध्यमवर्गीय आणि कामगारांना बंपर लॉटरी देणारा ठरला आहे. कारण पियूष गोयल यांनी शेतकरी, मध्यमवर्गीय आणि कामगारांना मोठा दिलासा देण्याचं काम केलं आहे. पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत मोदी सरकारने मध्यमवर्गींयांना दिलासा दिला आहे. पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही करत आता नसणार आहे. पियूष गोयल यांनी ही घोषणा करताच सगळ्यांनी मोदी मोदी मोदी घोषणा दिल्या. करप्रणालीमध्ये सरकार काय बदल करणार याकडे देशाच लक्ष लागून राहिलं होतं. त्या अपेक्षेनुसार सर्वात मोठा दिलासा मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना दिला आहे.
शेत मजुरांसह असंघटीत कामगारांसाठी पियूष गोयल यांनी पेन्शन योजना आणली आहे. 21 हजारांपेक्षा पगार असलेल्या तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना प्रतिमहिना 100 रुपये गुंतवावे लागणार आहे. 60 वर्षानंतर तीन हजार पेन्शन दिली जाणार आहे. देशभरातल्या 10 कोटी कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
याचसोबत अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. तर पाच एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रति महिना 500 रुपये दिले जाणार आहेत. पियूष गोयल यांनी ही घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.
40 हजारापर्यंतच्या बँकेत ठेवलेल्या रकमेवर आता टीडीएस लागणार नाही अशी घोषणाही गोयल यांनी केली.
पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. पियूष गोयल यांनी ही घोषणा करताच लोकसभेत मोदी मोदी मोदी अशा घोषणा दिल्या. मध्यमवर्गींयांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
येत्या पाच वर्षात 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती केली जाणार अशी घोषणा गोयल यांनी केली. तसेच भारतात मोबाइलवापरकर्ते दुप्पट झाले आहेत असेही गोयल यांनी म्हटले आहे.पाच वर्षात मोबाइट डेटाचा उपयोग 50 टक्क्यांनी वाढला असेही गोयल यांनी म्हटले आहे.
घर खरेदीवरचा जीएसटी कमी करण्याचा विचार आम्ही करतो आहोत असं गोयल यांनी म्हटलं आहे. मात्र त्याबद्दलची घोषणा करण्यात आली नाही. यासंदर्भातला निर्णय जीएसटी परिषद घेईल असंही गोयल यांनी म्हटलं आहे.
सिनेक्षेत्राशी संबंधित सगळ्या परवानग्या एकाच खिडकीवर मिळणार असं गोयल यांनी जाहीर केलं आहे. आपल्या भाषणात त्यांनी उरी सिनेमाचाही उल्लेख केला. पायरसी रोखण्यासाठी कठोर कायदा आणू अशीही घोषणा गोयल यांनी केली.
रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा पियूष गोयल यांनी केली आहे. त्यामुळे रेल्वेचा विकास होण्यास मदत होईल असंही गोयल यांनी म्हटलं आहे. वंदे मातरम ही पहिली हायस्पीड ट्रेन देशात धावणार असेही गोयल यांनी म्हटलं आहे.
मागील पाच वर्षात विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली. तसेच देशातील विमानतळंही वाढली लोकांचा प्रवास सुकर झाला, मोदी सरकारच्या धोरणामुळे हे शक्य झाल्याचे गोयल यांनी म्हटलं आहे.
गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांची पगारी सुट्टी मोदी सरकारने जाहीर केली आहे. पियूष गोयल यांनी लोकसभेत ही घोषणा केली.
सैनिकांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. वन रँक वन पेन्शन अंतर्गत सरकारने 35 हजार कोटी दिले आहेत असे पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. या वर्षी आपलं डिफेन्स बजेट 3 लाख कोटींच्या वर गेले आहे पहिल्यांदाच हे बजेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामध्ये निधी लागल्यास आम्ही आणखी निधी देऊ असेही गोयल यांनी म्हटलं आहे.
21 हजारापर्यंत पगार असलेल्यांना कामगारांना 7 हजार रुपये बोनस मिळणार अशी घोषणा पियूष गोयल यांनी केली. कामगारांसाठी मोदी सरकारतर्फे ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. तसेच ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख करण्यात आल्याचंही गोयल यांनी स्पष्ट केलं.
गायींसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना आणणार, या योजने अंतर्गत गायींच्या प्रजाती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असंही पियूष गोयल यांनी जाहीर केलं. तसंच मत्स्यपालनासाठी आता शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाणार, असंही गोयल यांनी जाहीर केलं. असंघटीत कामगारांसाठी ही मोठी घोषणा आहे असेच म्हणता येईल
अल्प भू धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करणार असल्याची घोषणा पियूष गोयल यांनी लोकसभेत केली. देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. डिसेंबर 2018 अंमलबजावणी केली जाणार असेही गोयल यांनी केली आहे.
गरीबांना स्वस्त धान्य मिळावं यासाठी 1 लाख 70 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचंही पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. 1 लाख 53 हजार घरं पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बनवली गेली असेही गोयल यांनी म्हटलं आहे.
2014 पर्यंत देशात अडीच कोटी कुटुंबं अंधारात होती. आम्ही सौभाग्य योजना आणली, मार्च 2019 पर्यंत सगळ्या कुटुंबांच्या घरात वीज मिळणार, आम्ही एलईडी बल्ब आणले ज्यामुळे वीज बिल आटोक्यात आले.Piyush Goyal: As a tribute to Mahatma Gandhi, world's largest behavioural change movement Swachh Bharat initiated; more than 98% rural sanitation coverage has been achieved; more than 5.45 lakh villages declared ODF #Budget2019 pic.twitter.com/WgcRDun9Tb— ANI (@ANI) February 1, 2019
राज्यांना आधीच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळणार अशी घोषणाही पियूष गोयल यांनी केली. तसंच बँकांच्या कर्जवसुलीला वेग आला आहे, आम्ही बँकिंग क्षेत्राला गती दिली. राज्यांना आधीच्या तुलनेत 10 टक्के जास्त उत्पन्न मिळणार आहे. अन्न, प्रवास, सेवा स्वस्त झाल्या. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लोकांचे जीवनमान उंचावले. रिअल इस्टेटमध्येही आम्ही पारदर्शकता आणली. रेरासारखे कायदे फायद्याचे ठरले. इतके दिवस फक्त आश्वासनं दिली जात होती. मात्र आमच्या सरकारने नुसती आश्वासनं दिली नाहीत तर ती पूर्ण केली.
2020 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार अशी घोषणा पियूष गोयल यांनी केली. देशातून घराणेशाही, भ्रष्टाचार आम्ही दूर केला. भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. आम्ही पारदर्शकतेचे नवे युग आणले आहे, आम्ही भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवलं. यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरचा बोजा वाढला होता तो आम्ही मागील पाच वर्षात कमी केला असंही गोयल यांनी म्हटलं आहे.
आमच्या सरकारने महागाईचं कंबरडं मोडलं असं म्हणत गोयल यांनी मोदी सरकारची स्तुती केली आहे.
मोदींच्या कार्यकाळात भारत प्रगतीकडे वाटचाल करणारा देश ठरतो आहे याचा सार्थ अभिमान वाटतो, विविध पातळ्यांवर देशाने प्रगती केली आहे असेही गोयल यांनी म्हटले आहे
लोकसभेत अर्थसंकल्प मांडण्यास हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सुरुवात केली आहे, याआधी विरोधकांनी काही वेळासाठी गोंधळ केला.
सरकारकडून अर्थसंकल्पातले काही मुद्दे प्रसारमाध्यमांना पाठवले जात आहेत, हा सरकारने केलेला गोपनीयतेचा भंग आहे अशी टीका काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मान्यता दिली आहे
Union Cabinet has approved the interim Budget 2019-20. #Budget2019
— ANI (@ANI) February 1, 2019
रेल्वेसाठी चांगल्या घोषणा होतील असा विश्वास आपल्याला वाटत असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स 151 अंकांनी वधारला आहे, शेअर बाजाराची ही सावध सुरुवात आहे असेच म्हणता येईल
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लोकप्रिय घोषणांचा पाऊस होईल, आम्ही या बजेटकडे असेच पहातो आहोत असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. लोकप्रिय घोषणांचे जुमले उभे राहतील असा टोलाही त्यांनी लगावला.
अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे, याच दिवसाचं औचित्य साधत तेलगु देसम पार्टीने सरकारचा निषेध केला आहे. काळे कपडे परिधान करून टीडीपीने संसदेबाहेर निदर्शनं केली आहेत.
अर्थमंत्री पीयूष गोयल हे हंगामी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत पोहोचले.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पीयूष गोयल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.