लोकसभा निवडणुकीतील पाच टप्प्यांमधील मतदान पार पडले असून देशात कोणाची सत्ता येणार याचे उत्तर २३ मे रोजी मिळणार आहे. देशात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच बुधवारी सकाळी तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी पार पडली आहे. यातील राजकीय भविष्यवाणीत देशातील राजा कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देशात स्थिर सरकार येईल असे संकेतही यातून मिळाले आहेत.

पाऊस, पीक, राजा, संरक्षण आणि आर्थिक अशा पाच गोष्टींचा भेंडवळच्या भविष्यवाणीत समावेश असतो. यात देशाचा राजा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत काय भविष्यवाणी वर्तवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भेंडवळच्या घटमांडणीत पानविडाच्या आाधारे राजाचे भविष्य सांगितले जाते. बुधवारी सकाळी भेंडवळची घटमांडणी पार पडली असून यात पानविडा कायम आहे. पान आणि त्यावरील नाणंही स्थिर आहे. मात्र, सुपारी किंचित हललेली होती. यातून देशात राजाची गादी कायम असेल आणि देशात स्थिर सरकार येईल, असे संकेत मिळाले आहेत. घटमांडणीतील करंजी हललेली असून त्यामुळे देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकते, असा अंदाजही यातून वर्तवण्यात आला आहे.याशिवाय परकीय घुसखोरी होत राहणार, पण संरक्षण खाते त्यास चोख प्रत्युत्तर देईल, असे यातून समोर आले आहे.

पिकांबाबत काय अंदाज
कापूस आणि गहू या पिकांचे उत्पादन मोघम स्वरुपात राहणार आणि ज्वारीचे पीक सर्वसाधारण येईल. पण भावात तेजी मात्र राहणार नाही, असा अंदाजही यात वर्तवण्यात आला आहे. यंदा कमी पावसाची शक्यता असून चारा-पाण्याची टंचाई येईल, असे देखील संकेत मिळाले आहेत.