आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे एका बसचा भीषण अपघात झाला. यात अपघातात ८ प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिरुपतीपासून २५ किलोमीटर अंतरावर बकरापेट येथे ही घटना घडली.

चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस उंच कड्यावरून खाली कोसळली, अशी माहिती तिरुपतीच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.

ही घटना शनिवारी (२६ मार्च) रात्रीच्या सुमारास घडली. ही खासगी बस भाकरपेटमध्ये घाटातून जात असताना एका वळणावर दरीत कोसळली. या अपघातात मृत्यू झालेले प्रवासी अनंतपुरम जिल्ह्यातील आहेत. हे सर्व प्रवास रविवारी सकाळी होणाऱ्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी जात होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी वेगात असल्याने हा अपघात झाला.

अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने बचाव मोहिमेला मोठा काळ लागला. तिरुपती पोलीस अधीक्षक व्ही अप्पाला नायडू आणि पथक अपघातस्थळी पोहचलं आहे. तसेच रोपच्या मदतीने जखमींना बाहेर काढलं. जखमींना उपचारासाठी तिरुपती आरयूआयए रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

आंध्र प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी, तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करत मृतांना आदरांजली वाहिली.