दिल्लीत आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ७ रेसकोर्स हे निवासस्थान या राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं. सगळ्यांचं लक्ष मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या नावांकडे लागलेलं असतानाच मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अचानक राजीनामा सत्र सुरू झालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्यासह अनेकांना डच्चू देण्यात आला. जवळपास ११ नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता आणखी दोन नेत्यांनी राजीनामे दिले आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजधानी दिल्लीत राजीनामा सत्र बघायला मिळालं. अनेक कॅबिनेट मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, यात तब्बल बारा मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या नावांपेक्षा राजीनामा देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या नावांची चर्चा होत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची मंत्रिमंडळातून गच्छंती करण्यात आली होती. त्यानंतर आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, सदानंद गौडा, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांचेही राजीनामे आले. त्यानंतर आता केंद्रीय माहिती व प्रसारण आणि अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनीही राजीनामा दिला असल्याचं निश्चित झालं आहे. हेही वाचा- ठरलं! नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चौघांचा मंत्रिमंडळात समावेश; मंत्र्यांची यादी जाहीर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी या मंत्र्यांची गच्छंती १) सदानंद गौडा २) रवि शंकर प्रसाद ३) थावर चंद गेहलोत ४) रमेश पोखरियाल निशंक ५) हर्ष वर्धन ६) प्रकाश जावडेकर ७) संतोष गंगवार ८) बाबूल सुप्रियो ९) संजय धोत्रे १०) रत्तन लाल कटारिया ११) प्रताप चंद्र सारंगी १२) सुश्री देबश्री चौधरी हेही वाचा- Narendra Modi Cabinet Expansion : मोदींच्या नव्या टीममध्ये ७ महिला मंत्र्यांचा समावेश रावसाहेब दानवे 'सेफ' इतर मंत्र्यांबरोबरच रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा दिल्याचं बोललं जात होतं. मात्र, अखेर यादी समोर आली असून यात रावसाहेब दानवे यांचा समावेश नाही. रावसाहेब दानवे यांनीही यावर खुलासा केला होता. 'पक्षातून कोणाचाही फोन आलेला नाही. मला राजीनामा देण्यासही सांगितले गेलं नाही,' असं दानवे यांनी स्पष्ट केलं होतं.