Caste census exercise to start from October 1, 2026 : भारतात १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल. यावेळी जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात केली जाईल. तर, देशाच्या उर्वरित भागात १ मार्च २०२७ पासून जनगणना केली जाईल. यावेळी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये जातीचा कॉलम (स्तंभ/रकाना) समाविष्ट करण्यात आला आहे.

जनगणना करणारे कर्मचारी प्रत्येक घरांत जाऊन लोकांची माहिती गोळा करतील. यामध्ये त्यांच्या जातीबाबतची माहिती देखील घेतली जाणार आहे. जातनिहाय लोकसंख्या जाणून घेणे, समाजातील विविध वर्गांची स्थिती जाणून घेणे हे त्यामागचं प्रमुख उद्दीष्ट आहे.

करोनामुळे जनगणना स्थगिती केली होती

भारतात २०११ साली शेवटची जनगणना करण्यात आली होती. तत्पूर्वी, दर १० वर्षांनी देशात जनगणना केली जात होती. त्यानुसार २०२१ मध्ये जनगणना करणं अपेक्षित होतं. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने जनगणना केली नाही. सुरुवातीला करोनामुळे जनगणनेचा निर्णय स्थगित केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, देश करोनाच्या संकटातून मुक्त झाल्यानंतरही जनगणना केली गेली नाही. परिणामी गेल्या पाच वर्षांपासून विरोधी पक्षांनी, प्रामुख्याने काँग्रेस व खासदार राहुल गांधी यांनी जनगणनेची मागणी लावून धरली. त्यांनी जातनिहाय जनगणनेवर जोर दिला. अखेर केंद्र सरकारने जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०११ साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी इतकी होती. तर २००१ च्या जनगणनेनुसार देशात १०२ कोटी लोक होते. दरम्यान, आता २०१६-२०२७ मध्ये जनगणना केली जाणार असून जनगणनेचं चक्र बदललं जाईल असं म्हटलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी होईल जनगणना

  • १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होणार
  • जनगणना दोन टप्प्यात पूर्ण होणार
  • यावेळी जनगणनेवेळी जातनिहाय लोकसंख्या मोजली जाणार
  • बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये जसे की जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होणार

जनगणना कशासाठी केली जाते?

जनगणनेत लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक माहिती गोळा केली जाते. याद्वारे लोकांची संख्या, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय व इतर महत्त्वाची माहिती गोळा केली जाते. म्हणजेच पुरुषांची संख्या किती? महिलांची किती? लोकांमधील शिक्षणाचं प्रमाण किती? व्यवसाय व बेरोजगारीचं प्रमाण किती? याबाबतची माहिती जमवली जाते. ही माहिती वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कारणांसाठी वापरली जाते. सरकारी धोरणं तयार करणे, नियोजन करणे, एखाद्या भागाचा विकास करण्यासाठी ही माहिती उपयोगी पडते.