CDS Anil Chauhan remarks on losses in Operation Sindoor : सीडीएस अनिल चौहान यांनी भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान विमानांचे नुकसान झाल्याची कबुली दिल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले असून सरकारने देशाला चार दिवसांच्या संघर्षागदरम्यान कोणते नुकसान झाले याबद्दल सत्य सांगावे अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सिंगापुर येथे दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले आहे. दरम्यान चौहान यांनी या मुलाखतीत पाकिस्तानकडून केला जाणारा सहा भारतीय विमाने पाडण्यात आल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

सीडीएस चौहान यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते उत्तम कुमार रेड्डी यांनी संघर्षादरम्यान विमान पाडण्यात आले का याबद्दल देशाला जाणून घ्यायचे आहे, विशेषतः सीडीएस यांच्या कबुलीनंतर, असे म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले की, २९ जुलै १९९९ साली वाजपेयी सरकारने कारगिल आढावा समिती स्थापन केली होती. ही समिती भारताचे स्टॅटेजीक अफेअर गुरू के. सुब्रम्हण्यम यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती, ज्यांचे पुत्र हे सध्या आपले परराष्ट्र मंत्री आहेत. याबरोबरच कारगिल युद्ध संपल्यानंतर तीनच दिवसांत हे पाऊल उचलण्यात आले होते, असेही रमेश म्हणाले आहेत.

“या समितीने पाच महिन्यांनंतर सविस्तर अहवाल सादर केला. आवश्यक सुधारणा केल्यानंतर ‘From Surprise to Reckoning’ हा अहवाल २३ फेब्रुवारी २००० रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पटलावर मांडण्यात आला. सिंगापूरमध्ये चीफ डिफेन्स स्टाफ यांनी नुकतेच जे उघड केले आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आता असेच पाऊल उचलेल का?” असा प्रश्न जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे नेमके म्हणणे काय आहे?

ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सीडीएस जनरल चौहान यांनी केलेले विधान समोर आल्यानंतर लगेचच रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “चार दिवसांच्या संघर्षादरम्यान राफेल विमान पाडण्यात आले स्पष्ट दिसून येते.” ते पुढे म्हणाले की, “आज, तासभरापूर्वी, चार दिवसांच्या संघर्षादरम्यान राफेल विमान पाडण्यात आल्याची सीडीएस जनरल चौहीन यांनी पुष्टी केली. खरं तर लढाऊ विमान पडले हे भारती सरकारने नाकारणे थांबवले पाहिजे. सीडीएस यांनी स्वत: सांगीतले आहे.”

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते रेड्डी म्हणाले की, “यापूर्वी डीजीएमओ यांच्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एअर मार्शल (अवधेश कुमार) भारती यांनी अप्रत्यक्षरित्या याचा उल्लेख केला होता. त्यांनी विशेषतः म्हटले होते की, ‘युद्धात नुकसान सामान्य बाब आहे आणि ऑपरेशनचे ध्येय साध्य झाले आहे आणि सर्व वैमानिक घरी परतले आहेत’.”

“ध्येय साध्य झाले (ऑपरेशन सिंदूरचे) याचा आम्हाला आनंद आहे, पण लढाऊ विमान पाडले गेले ही वस्तुस्थिती आहे… भारत सरकारने ते नाकारणे थांबवावे. सीडीएस यांनी स्वत: याचा उल्लेख केला आहे आणि एअर मार्शल भारती यांनीही असा उल्लेख केला होता,” असे रेड्डी म्हणाले. यावेळी रेड्डी यांनी स्पष्ट केले की काँग्रेसचा प्रत्येक प्रयत्नात भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा आहे.

“त्यांनी चांगले काम केले आहे म्हणून पक्ष त्यांचे अभिनंदन करतो आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे, आम्ही त्यांना सलाम करतो,” असे ते म्हणाले.

“आज संपूर्ण देशाच्या लक्षात आले पाहिजे की कोणत्यातरी कारणामुळे भारत सरकार जे काही घडले त्याबद्दल प्रामाणिक नाही. सरकारने पुनर्मूल्यांकन करण्याची दुसरी बाब म्हणजे चार दिवसांच्या संघर्षादरम्यान झालेला गोळीबार हा संबंधित देशांच्या सीमेतून करण्यात आला, तरीही आपण आपले विमान गमावले. मला वाटते की, यामुळे गांभीर्याने तंत्रज्ञानाते पुनर्मूल्यांकन करण्याची हरज आहे, जेणेकरून यातून धडा घेता येईल आणि आपण पुढे जाऊन या घटकांमध्ये सुधारणा करू शकू,” असे भारतीय हवाई दलाचे माजी पायलट रेड्डी म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षाकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप फेटाळून लावला.

रेड्डी यांनी दावा केला नेमकं काय घडलं हे बाहेर येऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. “भारत-पाकिस्तान ऑपरेशनमध्ये घडलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेबाबत सरकारने अधिक पारदर्शक असले पाहिजे असे आम्हाला वाटते,” असेही रेड्डी म्हणाले.

जनरल चौहान नेमकं काय म्हणाले?

मुलाखतीत बोलताना जनरल चौहान असे म्हणाले की, विमाने का पडली हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे, जेणेकरून भारतीय लष्कर त्यांच्या रणनीतीमध्ये सुधारणा करेल आणि पुन्हा प्रत्युत्तर देऊ शकेल. “मला वाटतं की जेट पाडलं जाणं महत्त्वाचं नाही तर ते का पाडण्यात आले हे महत्त्वाचं आहे,” असे सीडीएस जनरल चौहान म्हणाले.

या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानबरोबर झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान भारताने लढाऊ विमाने गमावली का, असा प्रश्न सीडीएसना विचारण्यात आला होता. “चांगली बाब ही आहे की आम्हाला आमच्या रनीतीमधील चुका समजल्याय, त्या दुरूस्त केल्या आणि सुधारणेसह दोन दिवसांनंतर पुन्हा त्याचा अवलंब केला. आम्ही आमची सर्व विमाने पुन्हा लांब पल्ल्याचे लक्ष्यांना भेदण्यासाठी उडवली,” असे चौहान म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान सहा भारतीय विमाने पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याबद्दल विचारले असता जनरल चौहान यांनी “हे पूर्णपणे चुकीचे आहे,” असे उत्तर दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय हवाई दलाचे हवाई ऑपरेशन्सचे महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी यापूर्वी नुकसान हे लढाईचा एक भाग आहे आणि सर्व आयएएफ पायलट सुरक्षितपणे घरी परतले आहेत, असे विधान केले होते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय विमानांचे नुकसान झाल्याबद्दल विचारले असता एअर मार्शल भारती यांनी ११ मे रोजी पत्रकार परिषदेत ही टिप्पणी केली होती.