आरक्षण बंद करु शकणारा अजून जन्माला आलेला नाही, असे ठणकावून सांगतानाच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी अॅट्रॉसिटीवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन काँग्रेसला फटकारले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतरत्नने सन्मान न करणाऱ्या  काँग्रेसला आता बाबासाहेबांची आठवण होत आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

अॅट्रॉसिटीबाबत दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. बंदच्या काळात भारताच्या विविध भागात हिंसक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर तातडीने फेरविचार याचिका दाखल केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुप्रीम कोर्टातून निर्णय येताच सरकारने फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या, आठ दिवसांमध्ये फेरविचार याचिका दाखल केली, असे त्यांनी सांगितले.

पासवान यांनी काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली. काँग्रेसने दलितांसाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी काहीच केले नाही. काँग्रेसने त्यांच्यासाठी फक्त अपशब्दांचा वापर केला. आंबेडकर यांचे छायाचित्र संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये देखील लावून नये, यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

आरक्षण बंद करु शकणारा अजून जन्माला आलेला नाही. खुद्द मोदींनीही आरक्षण बंद करण्यापूर्वी माझ्या मृतदेहावरुन जावे लागेल, असे सांगितल्याचे पासवान म्हणालेत.  बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या काँग्रेसने आंबेडकर यांना भारतरत्न का दिले नाही, असा सवाल त्यांनी विचारला. मृत्यूसमयी आंबेडकर यांच्याकडे औषधांसाठी देखील पैसे नव्हते, असेही त्यांनी सांगितले.