नवी दिल्ली : पाकिस्तानशी झालेल्या संघर्षावर काँग्रेस नेत्यांद्वारे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला तसेच विरोधी पक्षाची सुरू असलेली ‘जय हिंद यात्रा’ ‘जय पाकिस्तान’सारखी असल्याची टीका केली. काँग्रेसने जय हिंद यात्रा थांबवावी आणि त्याऐवजी पाकिस्तानशी सल्लामसलत करावी आणि संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी, असा टोमणा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी हाणला.
पात्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने गमावलेल्या विमानांच्या संख्येबद्दल वारंवार विचारणा केली तसेच जयराम रमेश यांनी परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील खासदारांची दहशतवाद्यांशी तुलना केल्याचा आरोप केला. गांधी यांनी कधीही पाकिस्तानमध्ये नष्ट झालेल्या दहशतवादी आणि हवाई तळांची माहिती विचारली नाही, परंतु त्यांच्या पक्षाने शेजारील देशापेक्षा भारतीय विमानांच्या नुकसानाबद्दल जास्त वेळा चौकशी केल्याचे ते म्हणाले.
सिंदूर वाटपाचे खंडन
दरम्यान, नरेंद्र मोदी सरकारच्या वर्धापन दिनानिमित्त सत्ताधारी भाजपने महिलांना सिंदूर वाटण्याची योजना आखल्याचे वृत्त पात्रा यांनी फेटाळून लावले. ऑपरेशन सिंदूरला कमी लेखण्यासाठी हा प्रचार पसरवल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी लष्करी संघर्ष आणि सिंधू पाणी कराराच्या निलंबनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा उल्लेख करीत विरोधी पक्ष हेतुपुरस्सर देशाचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.