काँग्रेसचे नेते कमलनाथ आणि बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या अलिकडच्या हिंदू राष्ट्राबद्दलच्या वक्तव्यांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. कमलनाथ अलिकडच्या काळात अनेकदा बागेश्वर धाममध्ये दिसले आहेत. त्यांनी नुकतंच छिंदवाडा येथे धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमानंतर हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केलं आहे. छिंदवाडा येथे धीरेंद्र शास्त्री यांचं तीन दिवसीय प्रवचन सुरू होतं. या प्रवचनाच्या समारोपावेळी कमलनाथ यांनी हजेरी लावली. यावेळी कलमनाथ यांनी ते धीरेंद्र शास्त्रींचे भक्त आहेत असं सांगितलं.
धीरेंद्र शास्त्रींच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपल्यानंतर काँग्रेसचे खासदार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कमलनाथ यांना हिंदू राष्ट्राबद्दल प्रश्न विचारल्यावर कमलनाथ यांनी दिलेल्या उत्तराने खळबळ उडाली आहे.
पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मागणीबाबत कमलनाथ यांना विचारल्यावर ते म्हणाले, “प्रत्येकाचं स्वतःचं मत असतं. सध्याच्या घडीला देशातली ८२ टक्के लोकसंख्या ही हिंदू आहे, तर मग हे कसलं राष्ट्र आहे? भारत हे आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे.” परंतु, आपण धर्मनिरपेक्ष असल्याचं त्यानी यावेळी सांगितले. तसेच माझा संविधानावर विश्वास आहे, असंही कमलनाथ म्हणाले.
हे ही वाचा >> खासदारकीपाठोपाठ बंगला परत मिळाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
कमलनाथ हे धीरेंद्र शास्त्रींपाठोपाठ पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत. ते म्हणाले, मी छिंदवाडामध्ये धीरेंद्र शास्त्रींचं प्रवचन आयोजित केलंय, म्हणून कोणाला अडचण आहे? कथावाचन आणि प्रवचन हे आपल्या देशाच्या आध्यात्मिक शक्तीचे प्रतिबिंब आहे. अध्यात्म हा भारताचा आत्मा आहे. मी १५ वर्षांपूर्वी हनुमानाचं मंदिर बांधलं आहे, माझ्या हनुमान भक्तीवर कोणीही शंका घेऊ शकत नाही.