उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार करण्यात आल्याने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही गुन्हा रोखला नाहीत पण गुन्हेगाराप्रमाणे वागलात अशी टीका प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश प्रशासनावर केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रियंका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “रात्री २.३० वाजता कुटुंबीय विनंती करत होते, पण उत्तर प्रदेश प्रशासनाने पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. जेव्हा ती जिवंत होती तेव्हा तिला सरकारने कोणतीही सुरक्षा दिली नाही. जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचारही केले नाहीत. पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कुटुंबीयांचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार काढून घेतला. मृत पीडितेला सन्मानही दिला नाही”.

आणखी वाचा- Hathras Gangrape: युपी पोलिसांकडून जबरदस्ती करण्यात आले पीडितेवर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांचा दावा

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “तुम्ही गुन्हा रोखला नाहीत तर गुन्हेगाराप्रमाणे वागलात. अत्याचार रोखले नाहीत तर एका निरागस मुलगी आणि तिच्या कुटुंबावर दुप्पट अत्याचार केले. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुमच्या कार्यकाळात न्याय नाही तर फक्त अन्याय सुरु आहे”.

आणखी वाचा- मोदींनी घेतली हाथरस सामूहिक बलात्काराची दखल, योगींना फोन करुन दिला आदेश; म्हणाले…

पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचं पार्थिव घरी आणलं जावं यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.

आणखी वाचा- उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

रात्री १० वाजता पीडित तरुणीचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान याआधी पीडित तरुणीच्या वडील आणि भावाकडून रुग्णालयाबाहेर निदर्शन करण्यात आलं. परवानगी न घेताच पार्थिव  नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यासोबत काँग्रेस तसंच भीम आर्मीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी यानंतर कुटुंब धरणे आंदोलन करत असून इतर काही संघटनांनी या मुद्द्यावर राजकारण सुरु केलं असल्याचा आरोप केला.

बलात्कार पीडित १९ वर्षीय दलित तरुणीचा दोन आठवड्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणीच १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.