महिलेवर पाळत ठेवण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याची केंद्र सरकारची कृती राजकीय सूडभावनेतून करण्यात आल्याच्या भाजपच्या आरोपाचे काँग्रेसने खंडन केले आहे. आयोग स्थापन करण्याची नितांत गरज होती. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही महिलेवर पाळत ठेवण्यात आली असल्याचे काँग्रेसचे नेते शकील अहमद यांनी ट्विट केले आहे.
काँग्रेसने काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत ध्वनिफीत सादर केली होती. त्यामध्ये मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शहा यांच्यातील संभाषण ध्वनिमुद्रित करण्यात आले होते. त्यामध्ये ‘साहेब’ असा उल्लेख होता ते ‘साहेब’ म्हणजे मोदी असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यामुळेच चौकशी आयोग स्थापन करणे गरजेचे होते, असेही अहमद यांनी म्हटले आहे.
आयोग स्थापन करण्याचा निर्णय हा संघराज्यीय रचनेवर हल्ला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र विरोधी पक्ष घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, मोदींनी सत्तेचा गैरवापर केला आहे आणि आयोग स्थापन करण्याची केंद्र सरकारची कृती हा सरकारचा हक्क आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे.