नवी दिल्ली : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी प्रेम चोप्रा तर कधी परेश रावळ यांच्यासारखे ‘डायलॉगबाजी’ करत आहेत. कधी ते म्हणतात, ‘माझ्या रक्तातून कुंकू वाहते… गोळ्या खा, रोटी खा,’ असे डायलॉग बोलत असतात. हे परिपक्व नेत्याचे लक्षण आहे का, कुठल्या देशाचा पंतप्रधान अशी डायलॉगबाजी करतो का,’’ असा प्रश्न करत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला लक्ष्य केले.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भातील त्यांच्या विधानांवर खेरा यांनी टिप्पणी केली. विरोधकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, त्याबद्दल मोदींनी मौन बाळगले आहे पण, जाहीरसभांमधून ते डायलॉगबाजी करत आहेत. इतकेच नव्हे तर देशाचे परदेश धोरण भाजपचे जल्पक समाजमाध्यमांवरून ठरवून लागले आहेत. भाजपचे जल्पक कधी इस्लामाबाद तर कधी कराची ताब्यात घेतल्याचा दावा करत असतात. हे जल्पक केंद्र सरकार चालवत आहेत. या जल्पकांचे मोदी प्रमुख बनले आहेत. त्यामुळे विदेश धोरण कसे पूर्णपणे फसले हेही दिसले, अशी टीकाही खेरा यांनी केली.
मोदी सरकारचे परदेश धोरण इतके फसलेले आहे की, भूतान आणि नेपाळ देखील आपल्याला पाठिंबा देत नाहीत. कुवेतने पाकिस्तानी नागरिकांना विनाव्हिसा प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त अरब अमिराती पाकिस्तानींसाठी पाच वर्षांचा व्हिसा देत आहेत. चीन, इराण हे देश उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देत आहे, असे टीकाही पवन खेरा यांनी केली.
भारताची बाजू जगासमोर मांडण्याचे आवाहन
पॅरिस : ‘भारत हा शांततेचा दीपस्तंभ असून, भारताचा दहशतवादाविरुद्ध चाललेला लढा जगाला सांगण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करावा,’ असे आवाहन भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी फ्रान्समधील भारतीय समुदायाला केले. जम्मू-काश्मीरमधील शांतता आणि विकासाला बाधा आणण्यासाठी पहलगाम येथील दहशतवादी हल्ला हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता, असे प्रसाद म्हणाले.
शिष्टमंडळातील काँग्रेस खासदारांची प्रशंसा
भाजपचे काही खासदार शिष्टमंडळात असून ते विदेशात जाऊन विरोधकांविरोधात विखारी ट्वीट करत आहेत. तिथे ते बहुधा पर्यटक म्हणून गेले असावेत असे दिसते. उलट, काँग्रेसचे खासदार भारताची बाजू प्रभावीपणे मांडत आहेत, असे सांगत खेरा यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मोदी सरकारने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींकडून शिकले पाहिजे. त्यांनी पाकिस्तानचा भूगोल कसा बदलला हे पाहिले पाहिजे पण, ते इंदिरा गांधींवरच टीका करू लागले आहे, असा आरोप पवन खेरा यांनी केला.
पहलगाममधील हल्लेखोरांना अजूनही पकडता आलेले नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले गेले मग, हाफीज सईद व मसूद अजहर सारखे दहशतवाद्यांचे म्होरके कसे निसटले, पाकिस्तानशी शस्त्रसंधी कशाच्या आधारावर केली, शस्त्रसंधी कोणत्या अटी-शर्तींवर केली गेली, या प्रश्नांची उत्तरे मोदींनी दिलेली नाहीत.-पवन खेरा, काँग्रेस नेते