चीनमध्ये सातत्याने करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणुतील नव्या उत्परिवर्तनाची माहिती मिळवण्यासाठी दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंगळवारी केली. मात्र आता वर्षाच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये इतर देशांमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग वाढणार का? या परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे संसर्गाची शक्यता अधिक आहे का? यासारखे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

परदेशातून येणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्या करोना चाचण्यांबद्दल अधिक सतर्क राहण्याची गरज असून घाबरुन जाण्याची गरज नाही असं मत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीचे प्रमुख असलेल्या डॉक्टर एन के अरोरा यांनी व्यक्त केलं आहे. भारत सरकारला करोनासंदर्भातील सल्ला देणाऱ्या समितीच्या प्रमुखांनी एका विशेष मुलाखतीमध्ये नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विमानवाहतूकीमध्ये वाढ होण्याच्या ट्रेण्डबद्दल भाष्य करताना हे विधान केलं.

प्रादुर्भाव देशांच्या सीमा पाहत नाही

नाताळ, नवीन वर्ष या पार्श्वभूमीवर परदेशात जाणारे आणि तिथून येणाऱ्या लोकांची संख्या वाढते. तर सध्या चीनमध्ये झालेल्या करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर यावर काही परिणाम होईल असं वाटतं का? असा प्रश्न अरोरा यांना ‘इंडिया टुडे’च्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अरोरा यांनी, “ज्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा आहे किंवा करणार आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. भारतात येणार लोक कुठूनही येत असले तरी त्यांच्या चाचण्या केल्या पाहिजेत. कारण या विषाणूचा प्रादुर्भाव देशांच्या सीमा पाहत नाही,” असं सांगितलं. मात्र त्याचवेळी भारतीयाचं पुरेश्या प्रमाणात लसीकरण झालं असून आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी नैसर्गिकपद्धतीने संसर्ग होऊन गेल्याने हायब्रिड इम्युनिटी म्हणजेच लसीची आणि नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने प्रादुर्भावाची शक्यता कमी असल्याचं अरोरा म्हणाले.

चाचण्यांची संख्या वाढवणार

कोणत्याही देशातून तो आपल्याकडे प्रवेश करु शकतो, असं सांगतानाच अरोरा यांनी आपल्या देशातील विमानतळांवर असलेल्या करोना चाचणी पद्धतीसंदर्भातही भाष्य केलं. “आपल्याकडे परदेशातून येणाऱ्यांच्या चाचण्या करण्याची पद्धत फारच सक्षम आहे. सध्याची परिस्थिती पाहात भविष्यात या चाचण्यांची संख्या वाढवली जाणार आहे,” असंही अरोरा यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> Bharat Jodo Yatra: “…नाहीतर ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करा”; ‘राष्ट्रहिता’चा उल्लेख करत मोदी सरकारचं राहुल गांधींना पत्र

…त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही

जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भात अधिक सतर्क होऊन काम करावं लागणार आहे. त्यामुळे एखादा वेगाने पसरणारा आणि जास्त घातक नवीन व्हेरिएंट आला तर त्याची माहिती लवकर मिळू शकते. सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करत आहेत त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही,” असं अरोरा म्हणाले.

मोठा गोंधळ निर्माण झाला नाही

केंद्राने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर आता जिनोम सिक्वेन्सिंगची पद्धत बदलली जाणार आहे का? असा प्रश्न अरोरा यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “नाही असं काही नाही. मी या जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भात निर्णय घेणाऱ्या गटाच्या संपर्कात आहे. नव्या व्हेरिएंटमुळे मागील वर्षाप्रमाणे मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलेलं नाही. मात्र आता आपली जिनोम सिक्वेन्सिंगसंदर्भातील यंत्रणा फारच सतर्क, सक्रीय असणं गरजेचं आहे,” असं सांगितलं.

नक्की पाहा >> जमीनीवरच व्हेंटिलेटर, CPR उपचार, रुग्णांना तपासता तपासता झोपी जाणारे डॉक्टर अन्…; चीनमधील करोनाची दाहकता दर्शवणारे Videos

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्या महत्त्वाची बैठक

“आपण डॅशबोर्ड तयार केला असून त्यावर दर आठवड्याची आकडेवारी पाहता येते. बीए-४, बीए-५ सारख्या व्हेरिएंटमुळे उत्तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाले. मात्र त्याचा भारतात प्रसार झाला नाही. जास्तीत जास्त रुग्ण हे बीएक्सएस आणि बी-२७५ या व्हेरिएंटचे जास्त रुग्ण या घडीला भारतात आहेत. मला सांगायचं असं आहे यंत्रणा कार्यरत आहेत. बऱ्याच गोष्टी आपण आधीच केलेल्या आहेत. उद्या आमची बैठक आहे. त्यात काय होईल हे समोर येईलच,” असं अरोरा यांनी सांगितलं.