Delhi Covid deaths May 2025: देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा करोना डोके वर काढताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोविड-१९ डॅशबोर्डनुसार, शनिवारी दिल्लीत कोविड-१९ मुळे आणखी दोन मृत्यूंची नोंद झाली आहे, ज्यामुळे जानेवारीपासून राजधानी दिल्लीत झालेल्या मृत्यूंची संख्या तीन झाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका ६० वर्षीय महिलेचा समावेश असून आतड्याचा गंभीर स्वरुपाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना कोविड १९ची लागण झाल्याचे निदान झाले होते. तर दुसरा रुग्ण हे ७१ वर्षीय पुरूष ज्यांना न्युमोनिया, सेप्टिक शॉक आणि किडनीला गंभीर इजा झाली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पुरवल्या जाणाऱ्या माहितीनुसार, दिल्लीत ३१ मे पर्यंत ३७५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यापैकी नवीन ८१ रुग्ण हे शुक्रवारी वाढले आहेत.
आशियामधील काही देशांमध्ये गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यादरम्यान दिल्ली आणि देशातील इतर काही भागात देखील मोठी वाढ पाहयला मिळत आहे. कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन संबंधित व्हेरियंटच्या प्रसारामुळे ही वाढ दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. या देशांमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी हा जेएन.१ प्रकाराच्या (LF.7 आणि NB1.8) उप-प्रकार असल्याचे म्हटले आहे.
जेएन.२ हा ओमिक्रॉनशी संबंधित बीए.२.८६ च्या वंशावळीतील आहे, याला पिरोला (Pirola) स्ट्रेन म्हणून ओळखले जाते. हा स्ट्रेन सध्याची प्रतिकारशक्ती टाळू शकतो आणि जास्त वेगाने संक्रमित होतो. पण आतापर्यंत त्याची लक्षणे ओमियक्रॉन व्हेरियंटशी संबंधित लक्षणांपेक्षा फार वेगळी नाहीत.
दरम्यान भारतात सध्या बहुतेक रुग्ण हे केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये आढळून येत आहेत. जामध्ये बहुतेक प्रकरणे ही सौम्य स्वरूपाची आहेत आणि त्यांच्यात मृत्यूदर देखील कमी आहे.
सध्या कुठे किती रुग्ण?
आकडेवारीनुसार, केरळमध्ये १,१४७ प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (४२४), दिल्ली (२९४) आणि गुजरात (२२३) यांचा क्रमांक लागतो. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी १४८ प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये ११६ प्रकरणे नोंदली गेली आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. तर गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. तथापि, बहुतेक कोविड प्रकरणे सौम्य असल्याचे नोंदवले गेले आहे आणि घाबरून जाण्याची गरज नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.