वर्ल्ड कपच्या सात सामन्यांमध्ये केवळ एक सामना हरून ११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेला भारत चक्क स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धचा कालचा सामना भारत हरला असल्यामुळे भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश अद्याप निश्चित झालेला नाही. उर्वरीत दोन सामन्यांपैकी किमान एक सामना भारतास जिंकावाच लागेल अन्यथा भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश अन्य सामन्यांमधील निकालांच्या व अन्य संघांच्या धावगतीच्या सरासरीवर अवलंबून असेल.
काय झालं तर भारत जाऊ शकतो स्पर्धेबाहेर…
भारताचे अजून दोन सामने खेळायचे बाकी आहेत. भारत जर बांगलादेशविरुद्धचा व श्रीलंकेविरुद्धचा असे दोन्ही सामने हरला तर भारताचे गुण अकराच राहतील. त्यामुळे बांगलादेशचे गुण नऊ होतील. श्रीलंका जिंकली तरी वर्ल्ड कपमधलं तिचं भवितव्य संपल्यात जमा असलं तरी भारतासाठी मात्र श्रीलंकेचा विजय वाईट ठरू शकतो. बुधवारी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना रंगणार असून हा सामना जर इंग्लंड जिंकली तर १२ गुणांसह इंग्लंडचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल.
तसं झालं तर ऑस्ट्रेलिया (१४ गुण), इंग्लंड (१२ गुण), न्यूझीलंड (११ गुण), भारत (११ गुण) अशी स्थिती होईल. भारताबरोबरचा तसेच पाकिस्तानविरुद्धचा असे दोन्ही सामने बांगलादेश जिंकला, तर बांगलादेशचे गुणही ११ होतील. परंतु बांगलादेश भारताविरुद्ध जिंकला व पाकिस्तानविरुद्ध हरला तर बांगलादेश स्पर्धेबाहेर जाईल परंतु पाकिस्तानचे गुण ११ होतील, कारण आत्ता पाकिस्तान ११ गुणांवर आहे. इंग्लंडचा सध्याचा फॉर्म बघता व घरच्या मैदानात हा संघ खेळत असल्यामुळे इंग्लंड न्यूझीलंडवर मात करण्यासाठी बुधवारी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल यात शंका नाही.
तसं झालं तर तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी प्रत्येकी ११ गुण असलेले न्यूझीलंड व भारत यांच्यासह पाकिस्तान किंवा बांगलादेश यांच्यातला एक संघ असे तीन संघ स्पर्धेत असतील. आणि धावगतीमध्ये सरस असलेले दोन संघ तिसरं व चौथं स्थान पटकावतील. जर भारताचा नेट रन रेट किंवा धावगती सगळ्यात कमी असेल तर भारत चक्क स्पर्धेबाहेर फेकला जाण्याची शक्यता आहे. आणि याचवेळी पाकिस्तानची धावगती भारतापेक्षा चांगली ठरली तर चक्क पाकिस्तान उपांत्य फेरीत जाऊ शकतो.
यामध्ये त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे साखळी सामन्यांमधील शेवटचा सामना भारताचा श्रीलंकेविरोधात असल्यामुळे या सामन्यापूर्वीच नक्की काय चित्र असेल याचा अंदाज आला असेल, ज्यामुळे भारताला रणनीती आखणं सोपं असेल एवढंच. परंतु ही वेळ येऊ द्यायची नसेल तर भारताला उद्याचा बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल.