CRPF Jawan Pakistani Wife: केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीए) शनिवारी एका जवानाला पाकिस्तानी महिलेशी केलेले लग्न लपवल्याबद्दल बडतर्फ केले. ही कारवाई करताना सीआरपीएफने, “जवानाचे वर्तन राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक आहे”, असे म्हटले होते.

या प्रकरणी एक निवेदन जारी करताना सीआरपीएफने म्हटले की, “एका गंभीर प्रकरणात, सीआरपीएफच्या ४१ बटालियनचे सीटी/जीडी मुनीर अहमद यांना पाकिस्तानी नागरिक असलेल्या महिलेशी केलेले लग्न लपवल्याबद्दल आणि जाणूनबुजून तिच्या व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ तिला आश्रय दिल्याबद्दल तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.”

“जवानाचे हे कृत्य सेवा वर्तनाचे उल्लंघन करणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे आढळून आले,” असे निवेदनात पुढे म्हटले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एका परदेशी नागरिकासह २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ भारत सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला मुनीर खान यांच्याशी ऑनलाइन लग्न करणाऱ्या मीनल खान या पाकिस्तानी महिलेला जम्मूहून पाकिस्तानमध्ये परत पाठवण्यात आले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले होते.

३० एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने जवानाची पत्नी मीनल खान यांना हद्दपारीपासून शेवटच्या क्षणी दिलासा दिला होता. ती जम्मूहून अटारी सीमेवर पोहचली होती तेव्हा तिच्या वकिलाने तिला न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली.

“सीआरपीएफ कॉन्स्टेबल असलेल्या मुनीर अहमद यांचे अडीच महिन्यांपूर्वी पाकिस्तानी नागरिक मीनल खान यांच्याशी लग्न झाले होते. त्या व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आल्या होत्या आणि नंतर दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता”, असे सीआरपीएफ जवानाच्या पत्नीचे प्रतिनिधित्व करणारे वकील अंकुश शर्मा यांनी एएनआयला सांगितले होते.

अंकुश शर्मा म्हणाले की, मीनल खान दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखतीला गेल्या होत्या आणि त्यांना दीर्घकालीन व्हिसा देण्यासाठी गृह मंत्रालयाकडे सकारात्मक शिफारसी पाठवण्यात आल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी, मीनल खान यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या कुटुंबाला एकत्र राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, “मला कुटुंबासोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी. पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांच्या झालेल्या क्रूर हत्येचा आम्ही निषेध करतो. हल्लेखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे”. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले होते.