निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाविरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षासंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. सोमवारी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना प्रशांत किशोर यांनी सध्या सत्तेत असणाऱ्यांना तिसरी किंवा चौथी आघाडी काही आव्हान निर्माण करु शकते असं मला वाटत नाही, असं मत व्यक्त केलं. तसेच सोमवारी (२१ जून २०२१ रोजी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती प्रशांत किशोर यांनी दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिसरी आघाडी यशस्वी ठरणार नाही…

अनेकदा चाचपणी करण्यात आलेली तिसरी आघाडी हा फार जुना प्रयोग आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये तो फारसा प्रभावी ठरणार नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत. प्रशांत किशोर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी सोमवारी शरद पवार यांची घेतलेली भेट ही तिसऱ्या आघाडीच्या उभारणीसाठी होती ही शक्यता निकाली निघाली आहे. तिसऱ्या आघाडीबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो नव्हतो असंही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची दुसऱ्यांदा भेट झालीय. यापूर्वी ११ जून रोजी पवार आणि किशोर हे शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेटले होते. त्यावेळी या दोघांची बैठक तीन तास सुरु होती.

या बैठकींमधून आम्ही दोघे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचंही प्रशांत भूषण यांनी म्हटलं आहे. यापूर्वी आम्ही कधीही एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळेच या बैठकींमधून आम्ही एकमेकांचे विचार जाणून घेत असल्याचे संकेत प्रशांत भूषण यांनी दिले.

नक्की वाचा >> महाआघाडीची चाचपणी

पवार- किशोर कशावर चर्चा झाली?

भाजपाविरोधात लढताना आम्ही वेगवेगळ्या राज्यांमधील राजकीय परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. भाजपाला टक्कर देताना कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या गोष्टी काम करु शकतात आणि कोणत्या नाही यावर आमची चर्चा झाली. सध्या आम्ही तिसऱ्या आघाडीचा विचार करत नसल्याचंही प्रशांत यांनी स्पष्ट केलं. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या प्रचाराची धुरा संभाळली होती. या विजयानंतर ममतांनी दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी , “तुम्ही सुद्धा भाजपाविरोधात उभे राहू शकता आणि त्यांना आव्हान देऊ शकता,” असं म्हणत विरोधकांना एकत्र येण्याचे संकेत दिले होते.

काँग्रेसबद्दल प्रशांत किशोर म्हणतात…

शरद पवार हे त्यांच्या अनुभवाच्या आधारे आणि संपर्कांच्या आधारे तर प्रशांत किशोर हे निवडणुकांसंदर्भातील नियोजनामध्ये मदत करु शकतात. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर सक्रीय राजकारणाशीसंबंधित क्षेत्रातून माघार घेण्याची भाषा करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केलीय. पक्षामध्ये अंतर्गत गोंधळ आहे हे मान्य करुन त्यावर उपाय शोधणे काँग्रेसला आवश्यक आहे, असं किशोर म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> “सकारात्मक राहण्यासाठी सरकारचे अंध प्रचारक होण्याची गरज आपल्याला नाही”

आज महत्वाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती, जनतेला भेडसावणारे प्रश्न आणि केंद्र सरकारची वादग्रस्त धोरणे या मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा केली जाणार असली तरी, संभाव्य बिगरभाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी हाच बैठकीचा प्रमुख हेतू असल्याचे मानले जाते.

चर्चेला मिळालं बळ

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी किशोर यांच्या ‘आय-पॅक’ कंपनीने यशस्वी निवडणूक रणनीती आखली होती. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर, केंद्रातील मोदी सरकारविरोधात बिगरभाजप-बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली असून, दिल्लीतील पवार-किशोर यांच्या भेटीने या चर्चेला बळ मिळाले आहे.

…म्हणून बैठक महत्वाची

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपविरोधात एकत्रितपणे लढण्याची रणनीती आखली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी होणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

नक्की वाचा >> ‘त्या’ वक्तव्यामुळे प्रशांत किशोर भाजपा समर्थकांकडून झालेले ट्रोल

राजकीय स्थितीवरही चर्चा होईल

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाचे उपाध्यक्ष बनलेले यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्र मंच’ या बिगरराजकीय संस्थेने ही बैठक आयोजित केली आहे. मात्र, त्यांनी भाजपविरोधी राजकीय आघाडीसंदर्भात बोलण्यास नकार दिला. मात्र, देशातील राजकीय स्थितीवर बैठकीत चर्चा केली जाईल, असे सिन्हा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ‘राष्ट्र मंच’ हे बिगरराजकीय व्यासपीठ असल्याने बैठकीला विरोधी पक्षनेत्यांसह बिगर राजकीय प्रतिनिधीही उपस्थित असतील. देशातील विविध मुद्दय़ांप्रमाणे राजकीय स्थितीवरही चर्चा होईल, असे यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या सहभागाविना?

काँग्रेसच्या ‘जी-२३’ गटातील नेते कपिल सिबल यांनाही या बैठकीचे निमंत्रण असले तरी आपण उपस्थित राहणार नसल्याचे सिबल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जाते. ही बैठक बिगरभाजप आघाडीच्या शक्याशक्यतेवर चर्चा करण्यासाठी होत असली तरी, काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी तयार करण्याबाबत शरद पवार वा अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

१५ पक्षांना निमंत्रण

माजी केंद्रीय मंत्री व मोदींचे विरोधक मानले जाणाऱ्या यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्र मंच’ या बिगरराजकीय संस्थेने ही बैठक आयोजित केली आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not believe 3rd 4th front can challenge bjp prashant kishor scsg
First published on: 22-06-2021 at 08:20 IST