काँग्रेसच्या ननविर्वाचित सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका असं सांगितलं आहे. उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी मतदारसंघात जाऊन काम करा असा सल्ला दिला. छोट्यातल्या छोट्या गटापर्यंत पक्षाचं काम कसं पोहचेल यावर सर्व निकाल अवलंबुन असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी प्रियंका गांधी यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षातून हाकलून बाहेर काढण्यात येईल असा इशाराही दिला आहे. बैठकीदरम्यान प्रियंका गांधी यांनी मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याची चाचपणी केली. प्रियंका गांधी यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशातील 41 जागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये वाराणसी, गोरखपूर, फैजाबाद, फुलपूर आणि झांसी सारख्या महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. याशिवाय राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ अमेठी आणि सोनिया गांधींच्या रायबरेलीचाही समावेश आहे.

प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितलं आहे. ‘मी या पदावर बसून कोणताही चमत्कार करु शकत नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनीच पक्षाला मजबूत करण्याची गरज आहे. राज्यात पक्षाला बळ मिळावं यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे’, असं यावेळी प्रियंका गांधींनी म्हटलं.