पीटीआय, नवी दिल्ली राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’, ‘खिसेकापू’ असा उल्लेख केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारची भाषा वापरणे अशोभनीय आहे, असे या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने गांधी यांना नोटीस पाठवली. ‘आदर्श आचारसंहिता नेत्यांना आपल्या प्रतिस्पध्र्यावर असत्यापित आरोप करण्यात मनाई करते,’ असे या नोटिशीत म्हटले आहे. हेही वाचा >>>काँग्रेसकडून गुर्जरांचा अपमान! पंतप्रधान मोदींचा आरोप ‘आरोप तथ्यहीन’ राजस्थानमधील बायतू येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पनवती’ असे संबोधून टीका केली होती. त्याशिवाय पंतप्रधानांनी ‘अतिश्रीमंतांना कर्जमाफी केली’ अशीही टीका करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे भाजपने सांगितले. निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात त्यांनी ठासून सांगितले की, गेल्या नऊ वर्षांत उद्योगपतींना १४ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचा आरोप तथ्यांवर आधारित नाही.