दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि मैतई समाजात सुरु असलेला संघर्ष अद्यापही सुरु आहे. या हिंसाचारावरून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तर, विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल सुरु आहे. अशात माजी लष्करप्रमुख एम.एम नरवणे यांनी मणिपूरमधील हिंसाचारावर भाष्य केलं आहे. सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या सुरक्षेसाठी चांगली नाही, असं नरवणे यांनी म्हटलं आहे.
इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे ‘राष्ट्रीय सुरक्षा परिप्रेक्ष्य’ विषयावरील चर्चेवेळी एम.एम नरवणे बोलत होते. एम.एम नरवणे म्हणाले की, “सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या सुरक्षेसाठी चांगली नाही. मणिपूरमधील हिंसाचारामध्ये विदेशी ताकदींचा हस्तक्षेप नाकारता येत नाही. तेथील बंडखोर गटांना चीनचा पाठिंबा आहे.”
हेही वाचा : ‘हिंसाचारामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का’; ‘इंडिया’ शिष्टमंडळाचे शांततेचे आवाहन
“गेल्या अनेक वर्षापासून चीन बंडखोर गटांना पाठिंबा देत आहे आणि यापुढेही देत राहिल. त्यामुळे सत्तेत असणारे याची दखल घेत कारवाई करतील,” अशी अपेक्षा नरवणे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : मणिपूरमधील नवा Video आला समोर; भररस्त्यात मशीन गनने गोळीबार? घटनेचं विचित्र सत्य आलं समोर
‘इंडिया’ आघाडीचे पथ हिंसाचारग्रस्त भागात
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या पथकाने शनिवारी चुराचंदपूर या दंगलग्रस्त शहराला भेट दिली. तेथे त्यांनी दंगलपीडितांचीही भेट घेतली. एका मदत शिबिराल भेट दिल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी केंद्र सरकारवर टीका केली. “अत्याचार प्रकरमाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याबाबत केंद्र सरकार आतापर्यंत झोपेत होते का?” असा सवाल चौधरींनी केला आहे.