वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने दिल्लीत हत्या केली. तसेच प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. या घटनेने देशभरात खळबळ उडाली. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करत असले, तरी तब्बल सहा महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आल्याने पुरावे गोळा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर नेमकी कोणती आव्हानं असतील याबाबत महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या बुधवारी (१६ नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलत होत्या.

माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर म्हणाल्या, “फार क्वचितवेळा मी इतकी थंड डोक्याने हत्या करणारे (कोल्ड ब्लडेड मर्डरर) पाहिले आहेत. एकतर्फी प्रेम असेल तर अॅसिड ओतणे, हत्या करणे असे प्रकार होतात. मात्र, अशाप्रकारे हत्येनंतर मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकणे आणि सहा महिने गुन्हा लपवणे निर्घृण आहे.”

पोलिसांसमोर नेमकी कोणती आव्हानं?

पोलिसांसमोर नेमकी कोणती आव्हानं? यावर बोलताना मीरा बोरवणकर म्हणाल्या, “पहिलं आव्हान म्हणजे यात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. याशिवाय मृत तरुणीचा मृतदेहही मिळाला नाही. पोलिसांना मृतदेहाचे काही भाग मिळालेत. पोलिसांना आधी ६ महिन्यांनी मिळालेले शरिराचे तुकडे श्रद्धाचे असल्याचे सिद्ध करावे लागेल. आरोपी जे सांगत आहे त्यावर विश्वास न ठेवता खोलात जाऊन हत्येचा उद्देश सिद्ध करावा लागेल.”

“सहा महिन्यांनंतरही कुठे ना कुठे रक्ताचे नमुने मिळू शकतात”

“आरोपी म्हणत आहे की, तो दररोज जंगलात जात होता. तो सोबत मोबाईल घेऊन जात असेल तर कॉल डिटेल्सवरून लोकेशन काढता येईल. आरोपीने ज्या ठिकाणी खून केला त्या ठिकाणी सहा महिन्यांनंतरही कुठे ना कुठे रक्ताचे नमुने मिळू शकतात. केसाचा नमुना मिळाला, तर त्याचाही तपास करता येईल.”

हेही वाचा : Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी Google चा वापर, मोठा फ्रिज, अगरबत्ती अन्…; आफताबने नोंदवला जबाब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोठ्या प्रमाणात न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करावे लागतील”

“आरोपी रात्री ज्या मार्गाने जात होता त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासून जाण्याचे पुरावे मिळू शकतात. काही सुरक्षारक्षक आरोपीला ओळखू शकतात. अशापद्धतीने काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, हत्याचे उद्देश आणि मोठ्या प्रमाणात न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यावरच हे प्रकरण अवलंबून असेल,” असं मत मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केलं.