पीटीआय, नवी दिल्ली
पाकिस्तानशी चर्चा द्विपक्षीयच असेल, त्यात कोणताही बदल नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठणकावले. जयशंकर यांनी ही स्पष्ट भूमिका घेतली असतानाच आता सिंधू जल कराराबाबत भारताच्या आक्षेपांबाबत चर्चा करण्याची तयारी पाकिस्तानने दर्शवली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित ठेवला आहे. तसेच यात कोणताही बदल होणार नसल्याचा पुनरुच्चार जलशक्ती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
दिल्लीत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पहलगाम हल्ल्यातील दोषींवर कारवाईची गरज व्यक्त केली होती. ऑपरेशन सिंदूरद्वारे आम्ही ती ७ मे रोजी पूर्ण केली असे जयशंकर यांनी नमूद केले.
पाकिस्तानशी चर्चा करताना आमची भूमिका यापूर्वीच स्पष्ट आहे. ही चर्चा द्विपक्षीय असेल. तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरच चर्चा होईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. पाकिस्तानला दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवावे लागेल. तसेच पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा करण्याची सरकारची भूमिका जयशंकर यांनी अधोरेखित केली.
पाकिस्तानची नरमाई
● सिंधू जल करार स्थगित ठेवण्याच्या अधिसूचनेनंतर पाकिस्तानचे जल सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी पत्र पाठविले आहे. भारताने जे आक्षेप घेतले आहेत त्याबाबत चर्चा करण्यात तयार असल्याचे मुर्तजा यांनी नमूद केले. भारताच्या जल सचिव देबश्री मुखर्जी यांना पाठविलेल्या पत्रात करार स्थगित ठेवण्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया होत असल्याने हा करार स्थगित ठेवल्याचे सूत्रांनी नमूद केले.
● २४ एप्रिल रोजी मुखर्जी यांनी मुर्तजा यांना पत्र लिहून या करारानुसार पाकिस्तान प्रस्तावित चर्तेत सहभागी होण्यास पाकिस्तानचा इन्कार तसेच दहशतवादाला प्रोत्साहन हे कराराचे उल्लंघन असल्याचे बजावले होते. या पाण्यावर पाकिस्तान मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने करार स्थगित ठेवल्याने पाकिस्तान चर्चेला तयार झाल्याचे मानले जाते.