भारतामध्ये फेसबुकनं भाजपा नेते आणि संबंधित काही पेजेसवर कारवाई करण्यास नकार दिल्याचं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलनं प्रसिद्ध केलं होतं. या वृत्तावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, फेसबुकच्या भूमिकेवरून वाद नवा वाद निर्माण झाला आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने ‘फेसबुक हेट स्पीच रूल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर अखेर फेसबुकनं खुलासा केला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनं आपल्या वृत्तात असं म्हटलं होतं की, "फेसबुक-इंडियाने भाजप नेत्यांची प्रक्षोभक भाषणे आणि आक्षेपार्ह मजकूर नियमांनुसार काढून टाकले नाहीत. फेसबुकसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून सत्ताधारी पक्षाला दुखावल्यास कंपनीच्या व्यावसायिक हितावर विपरित परिणाम होईल, या भीतीपोटी भाजपनेत्यांचा विद्वेषीमजकूर आणि भाषणांकडे दुर्लक्ष केले." फेसबुकच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणाऱ्या या वृत्तानंतर भारतात राजकीय पक्षांनी भाजपाला लक्ष्य केलं. त्याचबरोबर फेसबुक भाजपाच्या नियंत्रणात असल्याचा आरोप केला होता. या वादावर फेसबुकच्या प्रवक्त्यांनी खुलासा केला आहे. "कोणचंही राजकीय वजन वा पक्षांशी संबंधाचा विचार न करता आम्ही हिंसेला चिथावणी देणारी द्वेषयुक्त भाषण आणि लिखाणाला प्रतिबंधित करतो. हेच धोरण जागतिक पातळीवर अमलात आणतो. अचूकता व चांगुलपणा यांची निश्चितता करण्यासाठी आम्ही या अमलबजावणीसंदर्भात प्रगतीवर आहोत आणि या प्रक्रियेची नियमितपणे आढावा घेत आहोत," असं फेसबुकच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. We prohibit hate speech&content that incites violence&we enforce these policies globally without regard to anyone’s political position/party affiliation. We're making progress on enforcement&conduct regular audits of our process to ensure fairness&accuracy: Facebook spokesperson pic.twitter.com/8zHJhZuXXJ — ANI (@ANI) August 17, 2020 आणखी वाचा- फेसबुकच्या भूमिकेवरून वादंग वृत्तात काय? ’भाजपनेते टी. राजा सिंह यांनी फेसबुकवर आणि जाहीरपणेही रोहिंग्या मुस्लीमांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे म्हटले होते. ’ मुस्लीम देशद्रोही आहेत, मशिदी उद्ध्वस्त केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या पोस्टला फेसबुक कर्मचाऱ्याने विरोध करून ती पोस्ट कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे म्हटले होते. ’परंतु भाजपच्या नेत्यांच्या पोस्टवर कारवाई केल्यास कंपनीच्या व्यावसायिक हिताला बाधा येऊ शकते, अशी भूमिका ‘फेसबुक’च्या धोरण संचालक आँखी दास यांनी घेतली होती.